निर्भीडसत्ता न्यूज
पुणे- हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कच्या समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार आहे. या बाबत काम करणा-या विविध विभागांमधील समन्वयासाठी जिल्हाधिकारी समन्वयक म्हणून काम करतील, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे.
हिंजवडी येथील आयटी पार्कला त्यांनी नुकतीच भेट देवून तेथील उद्योजक आणि कर्मचा-यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, नगर नियोजन विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंते श्रीकांत सावने, ज्ञानदेव जुंधारे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख, कार्यकारी अभियंते सुधीर नागे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे, उपायुक्त अशोक मोराळे, हिंजवडीचे पोलीस निरीक्षक अरुण वायकर, वाहतूक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.
दोन तासाहून अधिक चाललेल्या या बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांना एचआयएने प्रमुख पायाभूत सुविधांसह रस्ते, पार्किंग, वाहतूक, सुरक्षा आणि घनकचरा व्यवस्थापन आदी समस्यांबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे या समस्या सोडवण्यासाठी अल्प,मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या. या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून, पालकमंत्र्यांनी त्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकारी विविध विभागांदरम्यान समन्वय ठेवतील, असेही ते म्हणाले. या समस्यांबद्दल दर दोन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.