निर्भीडसत्ता न्यूज –
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकास होण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्याची जबाबदारी शिक्षकांनी स्वीकारणे गरजेचे आहे. मुलांचा शाश्वत विकास झाल्याशिवाय शाश्वत आनंद मिळत नाही, असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी पिंपरी येथे केले.
पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने मुख्याध्यापक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच पिंपरी गावातील पिंपरी वाघेरे शाळेमधे करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.
पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप,सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सरचिटणीस प्रमोद निसळ, नगरसेविका आशा शेंडगे, नगरसेवक नामदेव ढाके, हर्षल ढोरे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यास विद्यार्थी कोणतीही गोष्ट आत्मसात करू शकतात. त्यासाठी शिक्षकांच्या अध्यापन प्रक्रियेत सक्रीय सहभागी झाले पाहिजे. शाळेतील मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळा श्रमदानाने साफ ठेवता आली पाहिजे. कोणत्या वर्गाने, कोणत्या दिवशी काय स्वच्छता करायची याचे वेळापत्रक ठरवून दिले पाहिजे आणि ते काटेकोरपणे पाळलेही गेले पाहिजे. तसेच प्रत्येक विद्यार्थाला घरी फुलाफळाची लागवड, रोपे तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळालेल्या पैशाची बचत केली पाहिजे. बचतीचे पैसे बँकामध्ये जाऊन स्लिप भरणे अथवा काढणे हे स्वत: काम विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे. शाळांनी मुलांसाठी आरोग्य कार्ड दिले पाहिजे. वर्ग चांगले असले पाहिजेत, वर्ग चांगले असतील तर मुलांना चांगला ऑक्सीजन मिळू शकतो. त्यांचा मेंदू शांत राहू शकतो. शिक्षकांनी शाळेतील विजेची बचत केली पाहिजे. तसेच शाळांमध्ये ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर मुलांना शालेय साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे. हृदयविकार, शुगर हे आजार टाळण्यासाठी पाणी, पर्यावरण निसर्गाचे संतुलन राखणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार बी. एस. आवारी यांनी मानले.