शिरोळ | प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
पंचगंगा प्रदुषण यासह रस्त्यांच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेवून सरकार दरबारी प्रश्न मांडणार असून आमदार फंडातून शेतमजूर कष्टकरी मायबापासाठी रुग्णवाहिका दिली जाईल, शेतमजूरांच्या व्यथा व वेदना मोठ्या आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार अशी ग्वाही कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील ग्रामपंचायत कार्यालय चौकात रयत क्रांती शेतमजूर कष्टकरी संघटनेच्या वतीने जाहीर सभा झाली त्यावेळी खोत बोलत होते.
शोभाताई पानदारे, विद्याधर कोठावळे, श्रीकांत घाटगे, परेश भोसले, आकाश राणे, पृथ्वीराज यादव, सुनिता पाटील, दिलीप माणगांवे, विनोद कागले, मुबारक मुल्ला यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, खऱ्या अर्थाने देवदूत म्हणून सासणे हे शेतमजूर चळवळीचे काम करीत आहेत, शेतकरी व शेतमजूर कष्टकऱ्यांचं जिवाभावाचं नातं घट्ट झाल्याने श्वासात श्वास असेपर्यंत चळवळीसाठी योगदान देईन.
यावेळी विजय भोजे, सतेंद्रराजे नाईक-निंबाळकर, सागर खोत यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच बिलकीस मुजावर यांनी नाखोत यांचा सत्कार केला. आभार डॉ. कुमार पाटील यांनी मानले.