निर्भीडसत्ता न्यूज –
देशी गाय आज लोप पावत चालली आहे. हिंदू धर्मात देशी गायीला पवित्र मानले जाते पण आज देशी गायीपेक्षा संकरित गाया पाळल्या जात आहे. त्यामुळे देशी गायींचे संवर्धन व पोषण होणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गोसेवा समिती पुणे आयोजीत राज्यातील पहिला भव्य राज्यस्तरीय देशी गोवंश प्रदर्शन, स्पर्धा व विक्री मेळावाचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच भव्य तांदूळ महोत्सवाचे पुणे जिल्हा पालकमंत्री गिरिश बापट यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, नगरसेवक वसंत बोराटे, सारिका बोर्हाडे, अश्विनी जाधव, राहुल जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य प्रशासक दिलीप खैरे, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकिय संचालक गोरख दगडे, गोसेवा समिती प्रमुख, रविंद्र रबडॆ आदी उपस्थित होते.
विजय शिवतारे पुढे म्हणाले, शेतक-यांना उत्पन्न व पूरक व्यवसायाला दिशा मिळावी. या उद्देशाने असे कार्यक्रम वाखाण्याजोगे आहेत. संकरित गायी पेक्षा देशी गायींपासून सकस दूध मिळते. आज जागतिक पातळीवर निर्यातीसाठी भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या शेतीसाठी रासायनिक खतांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे, ग्रामीण भागात कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढत आहे.
गिरीश बापट म्हणाले, जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांसाठी असे उपक्रम राबविण्यात यावेत, तांदूळ हा प्रसिद्ध प्रकार आहे, त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. इंद्रायणी तांदळाची परदेशात खूप मागणी आहे. आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा वाढत आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून शेतीला असे पूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात 82% भाग हा कोरड वाहू शेतींवर अवलंबून आहे.
या मेळाव्यामध्ये विविध विविध जातींच्या अनेक गायींचा सहभाग आहे. तसेच अनेक आजार बरे करणारी देशी गो आधारित औषधे विक्री केंद्रे आहेत. जर्सी प्राण्या पेक्षाही जास्त दूध देणारी आपली भारतीय गाय गीर, थरपारकर, देवणी, लाल सींधी, साहिवाल, लाल कंधार,खिलार, पंगानूर आणि आदी जातीच्या गाई आहेत. अनेक जातीची देखणी वासरे आहेत. देशी गो वंश आरोग्य विषयक पुस्तक प्रदर्शन, तज्ञ मान्यवरांची व्याख्याने, सर्वोत्कृष्ट देशी गाई स्पर्धा असे उपक्रम आहेत. तांदूळ महोत्सवात महाराष्ट्रातील हा पहिलाच भव्य शेतकरी तांदूळ महोत्सव १८ डिसेंबर पर्यंत असणार आहे.
गोलख दगडे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन रमेश उंद्रे यांनी, तर आभार दिलीप खैरे यांनी केले.