निर्भीड न्यूज –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व मानवाचे हित डोळ्यासमोर ठेवून मानवाच्या विकासासाठी संघर्ष केला. त्यांनी दाखविलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मार्गाने वाटचाल केल्यास, सर्वांचा उत्कर्ष होईल, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केले.
जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कॅम्प आणि परिसरातील सर्व विहार संघ, मंडळे, संस्था, महिला व पुरुष बचत गट अशा अनेक संस्थांनी एकत्र येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्याचे ठरविले आहे. त्या अंतर्गत सांगवी येथे रविवार, दि. 17 एप्रिल रोजी सकाळी ‘समता संघर्ष दौड’ (मॅरेथॉन) स्पर्धा घेण्यात आली. डॉ. गाडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
पीएमपीएमएलच्या जुनी सांगवी येथील शेवटचा बस थांबा ते जय भीम चौक (सृष्टी चौक) दरम्यान स्पर्धा घेण्यात आली. तब्बल 780 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला टीशर्ट, प्रमाणपत्र, विजेत्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, कार्याध्यक्ष राहुल काकडे, खजिनदार चंद्रकांत वाकोडे, अविनाश गवळी, राजेश नितनवरे, दयानंद चव्हाण, संदीप नितनवरे, गजानन कांबळे,सिद्धार्थ मराडे, नयन आहिरे, अरविंद कसबे, विनायक गायकवाड आदि या वेळी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. गाडे म्हणाले की, आजच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या समन्यायी पाणी वाटप धोरणाची गरज असल्याचे दिसते. अर्थशास्त्राविषयी त्यांनी सांगितलेल्या सुत्रांची आता गरज निर्माण झाली आहे. त्यांनी समाजाला समतेचे विचार दिले, असेही डॉ. गाडे म्हणाले.
फोटोओळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवांतर्गत सांगवी येथे रविवारी समता संघर्ष दौड स्पर्धा घेण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे. या वेळी अमरसिंग आदियाल, राहुल काकडे आदी.