सैनिक टाकळी / प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
३१ डिसेंबर या जून्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाचे स्वागत या नावाखाली अनेक लोक मौज मजा करतात पण सैनिक टाकळी मधील युवकांनी ३१ डिसेंबर रोजी एक अनोखा उपक्रम राबवला. सैनिक टाकळी येथिल कृष्णा नदी काठावरच्या रामेश्वर मंदिराची व स्मशान भुमिची स्वच्छता केली आणि याच मंदिर परिसरामधून शेवटचा सुर्यास्त पाहीला.
सैनिक टाकळी येथील हे देवस्थान रामगया तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. स्कंद पुराणातील कृष्णा महात्म्य या ग्रंथा मध्ये या देवस्थानचा उल्लेख अढळतो. या परिसरामधून प्रभू रामचंद्र, माता सिता, लक्ष्मण यांनी आपल्या वनवास काळात भ्रमंती केली आहे. महर्षी व्यास व त्यांचे शिष्य याज्ञवल्क्य यांनी तिर्थाटन केले आहे. विशेष म्हणजे २१ वेळा पृथ्वी नि: क्षत्रिय करणार्या परशूरामांनी पाप मुक्त होण्यासाठी याच ठिकाणी पिंडदान केल्याचा उल्लेख ३० व्या आणि ३१ व्या अध्यायात आहे. या गोष्टीचा पुरावा म्हणून माता सितेने बनवलेले वाळूचे शिवलिंग व महर्षी व्यासांनी बनवलेले कामधेनू शिवलिंग आजही नदी काठावरच्या या मंदिरात आहे. परशूरामांनी पिंडदान केलेली ती प्रेत शिळा ( मांडी घालून झोपवलेल्या प्रेताच्या आकाराचा दगड ) नदी पात्रात आहे. हा परीसर सध्या परतप्रांत अशा अपभ्रंष शब्दाने ओळखला जातो, ऋर्षीमुनींनी बनवलेला दगडी चोपाळा सुध्दा नदी पात्रात आहे. नदी कोरडी पडली की, तो स्पष्ट पहायला मिळतो.
या विषयाची माहिती असणारे अनेक लोक मोठ्या श्रध्देने इथे येतात. शिवलिंगाच्या दर्शनाने मनोकामना पुर्ण होतात असेही म्हटले जाते. मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून रक्षा विसर्जन करण्यासाठी, पिंडदान करण्यासाठी लोक दूरवरून येत असतात.नृसिंहवाडी येथिल दत्त मंदिर व खिद्रापूर येथिल कोपेश्वर मंदिराबरोबर सैनिक टाकळी येथिल रामगया तिर्थक्षेत्र पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू व्हावा यासाठी प्रयत्न सूरू आहेत.
स्वच्छता राखा, मेलेली जनावरे, व्यालेल्या जनावरांची वार पाण्यात टाकू नका, नदीचे प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करा.गावासाठी याच पाण्याचा पुरवठा होतो आहे, आपल्या प्रिय व्यक्तीच्या अस्थी एखाद्या झाडाच्या मुळांशी खड्डा काढून पूरा.अथवा एखादा नविन खड्डा काढून पूरा शक्य असल्यास त्यावर एखादे रोप लावा, रक्षा विसर्जन अथवा पिंडदान करण्यासाठी साहित्य घालून आणलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या, बाटल्या, काचेच्या बांगड्या व इतर साहित्य इतरत्र टाकू नका, मृतांच्या नातेवाईकांनी डुई दिलेल्या केसांची योग्य विल्हेवाट लावा, पाण्याची टाकी भरून घेण्यासाठी ग्रा.प. कर्मचार्याशी संपर्क साधा असे ग्रामस्थांना आवाहान करण्यात आले आहे.
लेखक मनोहर भोसले यांच्या संकल्पनेमधून राबवण्यात आलेल्या या उपक्रमास संभाजीनगर मधील श्री छ शिवाजी तरूण मंडळाने उत्स्फूर्त दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमर पाटील, सदस्य सोपान पाटील, अशोक पाटील, तुकाराम पाटील, महादेव पाटील, चंद्रकात भोसले, सुशांत कदम, शिवाजी पाटील, आनंदा चव्हाण, गणपती कुंभारआदि या वेळी उपस्थित होते.
या उपक्रमामधून शिवसेना उप जिल्हा प्रमुख मधुकर पाटील, माजी ग्रा.प.सदस्य महादेव पाटील, विद्यमान सदस्य राजू कोळी, माजी सरपंच वसंत कोळी गुरूदत्त शुगर्सचे सिक्युरीटी कर्मचारी शाहीर चावरे यांनीही श्रमदान केले. सैनिक टाकळीच्या युवकांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.