निर्भीड न्यूज –
रहाटणी येथील भारत ट्रेडर्सच्या वतीने तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आले. या महोत्सवांतर्गत ‘दुष्काळग्रस्तांसाठी एक मूठ तांदूळ’ उपक्रम राबविण्यात येत आहे. गुरुवार, दि. 21 एप्रिल रोजी नाना काटे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक कैलास थोपटे, विजय सुतार, विक्रीकर निरीक्षक प्रशांत मोरे, महापालिकेचे स्वीकृत सदस्य गोरक्षनाथ पाषाणकर, भारत ट्रेडर्सचे अर्जून खामकर, सतीश खामकर आदी या वेळी उपस्थित होते.
नाना काटे या वेळी म्हणाले की, दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबाला दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भारत ट्रेडर्सच्या वतीने राबविण्यात येणारा ‘दुष्काळग्रस्तांसाठी एक मूठ तांदूळ’ हा उपक्रम स्तुत्य आहे. असे उपक्रम राबविण्यावर भर दिला पाहिजे.
अर्जून खामकर या वेळी म्हणाले की, सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाना खायला अन्न आणि पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेवत भारत ट्रेडर्सच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी एक मूठ तांदूळ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
भारत ट्रेडर्सच्या वतीने तांदूळ महोत्सव राबविण्यात येत असून या महोत्सवाअंतर्गत तांदूळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी त्यांनी खरेदी केलेल्या तांदुळातील एक मूठ तांदूळ या दुष्काळग्रस्तांसाठी द्यावा, अशी विनंती करण्यात येत आहे. यासोबतच रोख स्वरुपात मदत करण्याची इच्छा असलेल्यांसाठीही येथे दानपेटी ठेवण्यात आली आहे. याला प्रतिसाद देत जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. जेणेकरून दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळेल.