जावली | मेढा
निर्भीडसत्ता न्यूज –
आंदोलनाची भिती दाखवुन शासकीय अधिका-यांविरूद्ध खोटे अर्ज करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या खंडणी प्रकरणातील आरोपी संजय कोंडीबा गाडे याची २६ जानेवारीला न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. कोणतीही परवानगी न घेता, बेकायदा जमाव जमवुन मेढा तहसिल कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी आरोपी आंदोलनासाठी आला. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास कोठडी सुनावली.
हॉटेल व्यवसायिकाकाडे खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्या हॉटेल व्यवसायिकाविरूद्ध कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित व्यकतीविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी मेढा पोलीस ठाण्यातील अधिका-यांवर दबाव आणण्याचा गाडे याने प्रयत्न केला. पोलीस अधिका-यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आपल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. असे आश्वासन देत, बेकायदेशीर जमाव जमवुन आंदोलन करू नये, अशी पोलीस अधिका-यांनी त्यास सूचनाही केली. मात्र आंदोलन करणारच अशी आग्रही भूमिका आरोपी गाडे याने घेतली. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
अवैध धंदे बंद करावेत, या मागणीसाठी आरोपी गाडे याने कोणतीही पुर्वपरवानगी न घेता २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी ‘मुंडन आंदोलन’ करण्याचे जाहीर केले होते. तसे फलक मेढा तहसिल कार्यालयाजवळ लावले. स्टेज उभारले. त्याच्याकडून दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक जीवन माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय तडाखे, प्रकाश घनवट, संजय शिर्के, अभिजीत सुतार, धिरज कोरडे, श्रीकांत बामणे, विकास कदम, प्रकाश कुंभार यांच्या पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. मात्र मेढा पोलिसांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली, शनिवारी त्यास जामिनावर सोडले.
समाजात दहशत निर्माण करण्यासाठी अधिका-यांविरूद्ध खोटेनाटे अर्ज
आरोपी संजय कोंडीबा गाडे याच्याविरूद्ध मेढा आणि अन्य पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शासकीय अधिका-यांविरूद्ध खोटे नाटे अर्ज करून तो त्यांना वेठीस धरून समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा तो प्रयत्न करीत आहे. त्याच्यापासून जनतेच्या जिवितास, मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्या बेकायदेशीर कृत्यापासून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणुन त्यास अटक करून न्यायालयात हजर केले. असे पोलिसांनी प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.