निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी तत्वतः मंजुरी दिली असली तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पीसीसीएफने विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने कनेक्टिंग एनजीओ अंतर्गत आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून लाक्षणिक उपोषणाचा इशारा पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या मागणीसाठी एकत्र आवाहन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितल्याप्रमाणे महापालिकेने मेट्रोकडे डीपीआर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर या मार्गाचा डीपीआर करण्याचे काम सुरु असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात येत आहे. मात्र वल्लभनगर मेट्रो स्थानकाच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी ते निगडी या मार्गावर दुस-या टप्प्यात मेट्रो धावणार असल्याचे सांगितले. यावरून पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत जाणार का ? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पुणे शहराची बहीण असे संबोधले जाते. परंतु मोठमोठ्या योजना किंवा विकासाच्या संधी केवळ पुणे शहराला दिल्या जातात. पुणे मेट्रोला देखील पुण्याचे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रोमार्ग पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा पुणे शहरातून जास्त अंतर जात आहे. त्यामुळे त्याचा पिंपरी-चिंचवड शहराला काय फायदा, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.
पुणे मेट्रोचा पहिला टप्पा 11.5 हजार कोटींचा आहे. जर पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत गेली, तर या कामासाठी 850 कोटी रुपये एवढा खर्च येईल. ही रक्कम पहिल्या टप्प्याच्या केवळ 8 टक्के एवढी आहे. वाढीव निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि सीएसआर याअंतर्गत प्रयत्न करण्यात येऊ शकेल. संपूर्ण 850 कोटी रुपयांचा निधी पाच वर्षात जमा करायचा असल्याने वार्षिक 170 कोटी रुपये उभे करावे लागणार आहेत. दुस-या टप्प्यातील मेट्रोचा खर्च सुमारे 20 हजार कोटी रुपये इतका आहे. हा दुसरा टप्पा 2022 नंतर येणार आहे. त्यानंतर येणा-या अडचणींमध्ये देखील तेवढीच वाढ होणार आहे. सध्या पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी काही अडचणी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
निगडी बसस्थानकावरून पुणे शहराकडे जाण्यासाठी बसेस 150 टक्के भरुन जातात. तसेच या भागात शैक्षणिक संकुले, शासकीय कार्यालये, कामगार निवासस्थाने, शहरातील पर्यटनस्थळे, वाहतूक नगरी व अन्य महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत होणे आवश्यक आहे. निगडी परिसरात सुमारे साडेसहा लाख लोक राहतात. तसेच तळवडे, रावेत, चाकण या भागांसाठी निगडीतून पोहोचणे सहज शक्य आहे. निगडीपर्यंत मेट्रो आल्यास इथे ट्रान्सपोर्ट हब देखील करता येईल. यामुळे पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात आणखी भर पडेल.
पीसीसीएफच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या आंदोलनाला विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी, पोलिसमित्र व ज्येष्ठ नागरिक संघ यांसारख्या संघटना तसेच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो कात्रजपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून पिंपरी ते निगडी या मार्गावरील मेट्रो जाणीवपूर्वक रोखण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सुरु करण्यात आलेल्या मिस्ड कॉल मोहिमेस शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत सहा हजार पेक्षा जास्त नागरिकांनी 08030636448 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी महापालिका प्रशासन, मेट्रो प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन याबाबत सकारात्मक चर्चा करणे गरजेचे आहे.