निर्भीडसत्ता न्यूज –
समाजाची उंची तो सांस्कृतिकदृष्ट्या किती संपन्न आहे यावर मोजली पाहिजे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिका करते आहे हे स्तुत्य आहे. महाराष्ट्र ही कलाकारांची भूमी आहे, असे गौरवोद्गार पं. उल्हास कशाळकर यांनी काढले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर गुरुवार(१ फेब्रुवारी) पासून चार दिवसीय स्वरसागर महोत्सवाला प्रारंभ झाला. यंदा पंधरावा स्वरसागर पुरस्कार तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना पं. उल्हास कशाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, गायक महेश काळे, नगरसेवक नामदेव ढाके, शत्रुघ्न उर्फ बापू काटे, बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत कदम, उत्तम केंदळे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, कमल घोलप, शर्मिला बाबर, संयोजक व सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहसंयोजक संजय कांबळे, डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना पं. सुरेश तळवलकर म्हणाले की, संगीताची साधना नव्हे उपासना करावी. संगीत स्वतला विसरण्याची संधी देते. ऐकणा-या लोकांमध्ये वेगवेगळ्या रुची असणारे लोक असतात. त्या सगळ्यांची इच्छा महापालिकेने आयोजित केलेल्या या महोत्सवातून पूर्ण होते आहे, हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. शाल, श्रीफळ, रोख ५०,००० रु. सन्मानचिन्ह व मानपत्र असे पं. सुरेश तळवलकर यांना प्रदान करण्यात आलेल्या स्वरसागर पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी कै. पं. पद्माकर कुलकर्णी स्मृती पुरस्कार युवा गायिका शिल्पा आठल्ये यांना प्रदान करण्यात आला. तसेच झी मराठी वाहिनीवरील संगीतमय कार्यक्रमाचा तृतीय पुरस्कार पटकावल्याबद्दल युवा गायक अक्षय घाणेकर याचाही सन्मान करण्यात आला.
महापौर नितीन काळजे यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महापालिका विविध विकासकामांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम देखील करीत असते. त्यामुळे शहरातील कलाकारांना एक चांगले व्यासपीठ मिळते. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, महापालिकेत सत्तापरिवर्तन झाले आहे. आजवर या भागात असा कार्यक्रम कधीही झाला नाही. यंदा येथे तो प्रथमच होत आहे. उत्तुंग उंचीचे कलाकार येथे आले आहेत हे आमचे भाग्य.
पं. तळवलकर यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन संजय कांबळे यांनी केले. या मानपत्राचे लेखन देखील त्यांनीच केले होते. संयोजक प्रवीण तुपे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन मिलींद कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमाआधी महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत लोकरंग हा लोकगीतांचा कार्यक्रम नंदेश उमप आणि सहका-यांनी सादर केला. गण, गवळण, भारुड, माझी मैना गावावर राहिली ही छक्कड, कोळीगीत, पोवाडा, धनगरी नमन, गोंधळ आदी लोकगीते त्यांनी यावेळी जोशात सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. उद्घाटनानंतर डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा लोकप्रिय आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम झाला.