निर्भीडसत्ता न्यूज –
कोल्हापूरात धनगर समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी धनगर समाज क्रांतिकारी संघाच्यावतीनं आज कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात आला. ‘यळकोट, यळकोट जय मल्हार,’ ‘ऊठ धनगरा, जागा हो; आरक्षणाचा धागा हो,’ अशा घोषणा देण्यात आल्या. धनगरी ढोल वाजवत आणि धनगरी नृत्य करत पिवळ्या टोप्या, झेंडे घेऊन हजारो धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा, १९५५ च्या काकासाहेब कालेलकर आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करा आणि १९८२ च्या मंडळ आयोगाची शिफारस लागू करा या मागणीसाठी धनगर समाज राज्यभर आंदोलन करत आहेत. मात्र शासन याकडं गांभीर्यानं पाहत नाही. यासाठी धनगर समाज क्रांतिकारी संघाच्यावतीनं राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात धनगर समाजाच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो धनगर बांधव पिवळ्या टोप्या आणि पिवळे झेंडे घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या मोर्चात धनगरी ढोल, पारंपरिक धनगरी नृत्य , मल्हार देवाची प्रतिकात्मक रथ, लेझीम पथक आणि चित्ररथांचा सहभाग होता. गांधी मैदानातून निघालेला या विराट मोर्चाची सांगता दसरा चौकात झाली. यावेळी धनगर नेते विलास वाघमोडे यांनी धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर प्रतिकत्मक बिरदेव मंदिर उभारून 24 तास ढोल बाजाओ आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.
या मोर्चा दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अनेक प्रबोधन करणारे फलक घेऊन महिलांनी देखील या मोर्चाला चांगली उपस्थिती दर्शवली होती. येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण विधेयक मंजूर करावं अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा या मोर्चा द्वारे देण्यात आलाय.