निर्भीड न्यूज –
भौतिक, शारीरिक तथा मानसिक सुखांच्या पलिकडे जाऊन अध्यात्मिक सहजानंद मिळविण्यासाठी जैन धर्माचे तत्वज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी तप, ध्यान, साधनेतून मोक्षप्राप्ती कशी होते हे समजून घ्यावे लागेल. प्रत्येक आत्मा साधनेतून परमात्मा कसा बनू शकतो, हे समजण्यासाठी भगवान महावीर यांची शिकवण आचरणात आणावी लागेल, असे मत डॉ. मंजूश्री महाराज यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोमवार, दि. 9 मे 2016 रोजी मुंबई येथील पूर्वी अतुल घेलाणी-जैन या चिंचवडगावातील कल्याण प्रतिष्ठान येथे डॉ. मंजूश्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जैन धर्माची दिक्षा ग्रहण करणार आहेत. त्या प्रित्यर्थ त्यांचे शुक्रवार, दि. 2 एप्रिल रोजी चिंचवड येथे स्वागत करण्यात आले. या वेळी कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपटलाल नहार, प्रवीण पोकरणा, मोहन संचेती, सुरेश गादिया, अशोककुमार पगारीया, संतोष खाबीया, नितीन बेदमुथा, पोपटलाल बरडीया, सुरेश सेटीया, मोतीलाल चोरडीया, जवाहर भंडारी, संजय जैन, कुसुम भंडारी, सरला मोदी आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. मंजूश्री महाराज म्हणाल्या की, भौतिक सुखसोयींचा, मोहमायेचा त्याग करून संसारी जीवनातून दिक्षा घेणे हे दिव्य कर्तव्य आहे. यासाठी कठोर तप व साधना आवश्यक असून गुरुंच्या सान्निध्यात अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपटलाल नहार यांनी आवाहन केले की, 25 एप्रिल 2016 पासून 9 मे 2016 या कालावधीत कल्याण प्रतिष्ठान येथे पूर्वी अतुल घेलाणी-जैन यांच्या श्री जैन भगवनी दीक्षा व वर्षी तप पारणा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व बंधू-भगिनींनी उपस्थित राहून जैन तत्वज्ञान समजून घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.