निर्भीड न्यूज –
अहिराणीइतकी महान दुसरी संस्कृती नाही. खान्देशातील खेड्यांतील घराघरांतील महिलांनी अहिराणी टिकवली आणि ही संस्कृतीही जपली. संत ज्ञानेश्वरांनी मराठीचे महत्व सांगितले त्याही काळाच्या खूप पूर्वीपासून अहिराणीची महती आहे. त्यामुळे अहिराणी ही प्रतिभाशाली भाषा आहे, असे मत अहिराणीच्या जेष्ठ अभ्यासक डॉ. उषा सावंत यांनी व्यक्त केले.
खान्देश अहिराणी कस्तुरी मंचतर्फे चिंचवड येथे रविवार, दि. 24 एप्रिल रोजी तिसरे एकदिवसीय राज्यस्तरीय अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सावंत होत्या. डॉ. सावंत यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, कल्याण येथील खान्देश हित संग्राम संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, संमेलनाचे कार्याध्यक्ष नामदेव ढाके, स्वागताध्यक्ष विवेक ठाकरे, मुख्य आमंत्रक विजया मानमोडे, संयोजक समिती प्रमुख बापूसाहेब पिंगळे, रवींद्र माळी, ‘जनशक्ती’चे संपादक कुंदन ढाके, दिलीप माळी, प्रकाश पाटील, प्रवीण तरडे, देवयानी पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
दिवंगत पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना (मरणोत्तर) जाहीर करण्यात आलेला अखिल भारतीय खान्देश कोहिनूर पुरस्कार त्यांचे नातू राहुल जैन यांनी स्वीकारला. जेष्ठ अहिराणी साहित्यिक देविदास ऊर्फ बापूसाहेब हटकर यांना अहिराणी कस्तुरी ‘साहित्यरत्न’ पुरस्कार, ‘जनशक्ती’चे संपादक उद्योजक कुंदन ढाके यांना अहराणी कस्तुरी ‘खान्देशरत्न’ पुरस्कार, देऊळबंद या मराठी चित्रपटाचे निर्माते उद्योजक कैलास वाणी यांना अहिराणी कस्तुरी ‘कलारत्न’ पुरस्कार, उद्योजक दीपक पाटील यांना अहिराणी कस्तुरी ‘उद्योगरत्न’ पुरस्कार, ‘माय गीताई’ हा पहिला अहिराणी ग्रंथ लिहिणारे साहित्यिक सुरेश पवार यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देशरत्न’ पुरस्कार, खान्देशात मतीमंद आणि मूकबधीर मुलांसाठी कार्य करणारे दादाभाऊ ऊर्फ भैय्यासाहेब पाटील यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देशरत्न’ पुरस्कार, जेष्ठ नाटककार-गायक शिवदास जोंधळे यांना अहिराणी कस्तुरी ‘कलारत्न’ पुरस्कार, जेष्ठ अहिराणी साहित्यिक बापूसाहेब पिंगळे यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देशरत्न’ पुरस्कार, जेष्ठ अहिराणी साहित्यिक एम. के. भामरे यांना अहिराणी कस्तुरी ‘समाजरत्न’ पुरस्कार, कल्याण येथील खान्देश हित संग्राम संघटनेचे प्रवक्ता सुरेश पाटील यांना अहिराणी कस्तुरी ‘समाजरत्न’ पुरस्कार, पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार-कवी दीपेश सुराणा यांना अहिराणी कस्तुरी ‘समाजरत्न’ पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आला.
नामदेव ढाके, विवेक ठाकरे, विजया मानमोडे; तसेच ‘गरबा’ नृत्यात विशेष प्राविण्य मिळविलेल्या अशोक माळी यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. अहिराणी साहित्यिक लतिका चौधरी यांच्या ‘गल्लीनी भाऊबंदकी’ या पुस्तकाचे आणि अहिराणी कस्तुरी मासिकाचा आखाजी विशेषांकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले.
डॉ. सावंत या वेळी म्हणाल्या की, खान्देशात आजही खेड्यापाड्यात घरोघरी बहिणाबाई आहेत. त्यांच्याकडे अहिराणी लोकगीतांचा मोठा ठेवा आहे. दैनंदिन कामे करताना कामाचा ताण कमी व्हावा म्हणून या महिला चालता-बोलता गाणी म्हणतात. यातील बहुतांश गाणी ही स्वरचित असतात. म्हणी, ओव्या, उखाणेही या महिलांना शिघ्र पध्दतीने म्हणता येतात. या महिलांमुळे अहिराणी टिकून आहे. बोलीभाषा ही आपली माय असते; मात्र शिकलेल्या मुला-मुलींना ही आपली आई ओळखता आली नाही. त्यामुळे खान्देशातील घरोघरच्या या बहिणाबाई उपेक्षित राहिल्या. हे थांबले पाहिजे. त्यासाठी संशोधन करणा-या विद्यार्थ्यांनी अहिराणीशी संबंधित विषयावर ‘पीएचडी’ करावी किंवा या भाषेचा अभ्यास करावा.
अहिर नावाच्या राजाच्या काळात अहिराणी ही राजभाषा होती. या भाषेला राजयोग उपभोगता आला आहे. त्यामुळे या भाषेच्या नावातच ‘राणी’ आहे. असे राजवैभव प्राप्त असलेल्या अहिराणी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. खान्देशातील कानबाई उत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येतो. संपूर्ण भारतात देव डोक्यावर घेऊन नाचताना कोणी दिसत नाही; मात्र अहिराणी संस्कृतीत देवाला डोक्यावर घेऊन नाचतात आणि आनंद व्यक करतात. कान्हदेश अशी या भागाची ओळख होती; मात्र त्याचा अपभ्रंश झाला आणि खान्देश हे नाव रुढ झाले.
बापूसाहेब पिंगळे म्हणाले की, आपली आई अहिराणी आहे. मराठी मावशी, तर हिंदी ही काकू आहे. दोन कोटी अहिराणी भाषक आहेत. असे असतानाही ही भाषा अभ्यासक्रमात नाही. किामन खान्देशातील जिल्ह्यांमध्ये ती शिकविण्यात यावी. या भाषेला राजमान्यता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.
नामदेव ढाके म्हणाले की, अहिरणाची संवर्धन आणि विकास करण्यासाठी हे संमेलन आहे. खान्देश आणि अहिराणीचा उल्लेख आल्यावर सर्व जाती-धर्माची माणसे एकत्र येतात. पुणे, मुंबईसारख्या शहरात खान्देशातील युवक येतात तेव्हा ते दचकतात. त्यांना रोजगार सहज उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.
प्रास्ताविकात विजया मानमोडे म्हणाल्या की, आपण वेळ दिल्यास ही अहिराणी संस्कृती टिकेल. त्यामुळे पाश्चात्य विकृती टाळता येईल. खान्देशातील प्रत्येक जिल्ह्यासह पुणे-मुंबईसारख्या शहरांत खान्देश सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यांची बोलीभाषा असलेल्या गोंडी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. अहिराणी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासनस्तरावरून असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे.
देवयानी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अनुपमा जाधव यांच्यासह भटुलाल बागुल यांनी दमदार आवाज आणि खान्देशी बाज असलेले अस्सल अहिराणी विनोद यामुळे कार्यक्रमात रंगत भरली आणि सूत्रसंचालन दिलखुलास झाले.