निर्भीड न्यूज –
आपली भाषा आपली वाणी, अहिराणी माय अहिराणी.., घरोघर सन्देश, सोनाना खान्देश.., जय अहिराणी, जय खान्देश अशा जयघोषात अहिराणी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी काढण्यात आली. खान्देश अहिराणी कस्तुरी मंचतर्फे चिंचवड येथे रविवार, दि. 24 एप्रिल रोजी तिसरे एकदिवसीय राज्यस्तरीय अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलन झाले. यानिमित्त चिंचवडगावात ग्रंथदिडी काढण्यात आली.
या साहित्य संमेलनानिमित्त चिंचवडगावात अहिराणी साहित्यिकांची मांदियाळी होती. अहिराणी साहित्याचा ठेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना या निमित्ताने अनुभवता आला.
चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरपासून सकाळी ग्रंथदिडी काढण्यात आली. साहित्यिक तसेच मान्यवरांना या वेळी मानाचा फेटा बांधण्यात आला. बापूसाहेब पिंगळे, लतिका चौधरी, नामदेव ढाके, विवेक ठाकरे, रविंद्र माळी, विजया मानमोडे, सुरेश मानमोडे, देवयानी पाटील, सुनीता पाटील, भटुलाल बागुल, अनुपमा जाधव यांच्यासह खान्देशातून आलेले शेकडो जण या ग्रंथदिडीत सहभागी झाले होते.
अहिराणीचा जयघोष करतानाच अहिराणी गाणी या वेळी सादर करण्यात आली. अहिराणी साहित्यिक आणि मान्यवर या दिंडीतील पालखीचे भोई झाले. काही मान्यवर, साहित्य्कि आणि बापूसाहेब पिंगळे यांनी त्यांच्या पत्नी चंदा यांच्यासोबत फुगडीचा फेर धरल्याने या पालखी मिरवणुकीची रंगत वाढली. मिरवणुकीतील बैलगाडीही होती. त्यामुळे या मिरवणुकीत अस्सल खान्देशी बाज दिसून येत होता. वासुदेव आणि वारकरी पथकही या मिरवणुकी सहभागी झाले होते.
मोरया गोसावी मंदिरापासून वाजत-गाजत आणि नाचत निघालेल्या या ग्रंथदिंडीचा प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे समारोप झाला. त्यानंतर ग्रंथ असलेली पालखी प्रेक्षागृहातील व्यावपीठावर ठेवण्यात येऊन संमेलनाला सुरुवात करण्यात आली.