तडिपारीचे १३ प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पडून
मेढा / जावळी
निर्भीडसत्ता न्यूज –
पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारीला आणि अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना, महसुल खात्याचे मात्र सहकार्य मिळत नाही. त्यामुळे जावळी तालुक्यातील गुन्हेगार मोकाट आहेत. पोलिस अधिका-यांनी पाठविलेले तब्बल १३ प्रस्ताव महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांकडे पडून आहेत.
गुन्हे दाखल करायचे, कायदा सुव्वस्थेला बाधा आणणा-या तसेच समाज स्वास्थ बिघडविणा-या गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करून पाठवायचे. परंतू त्यावर ज्यांच्याकडून कारवाईसाठी शिफारस होणे अपेक्षित आहे, त्यांनीच त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येते. वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याने गुन्हेगारांना पळवाटा शोधण्यास संधी मिळू लागली आहे. तडिपारीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे कळताच, तडिपारी रद्दसाठी गुन्हेगारांची धावपळ सुरू होते. राजकीय नेत्यांचे उंबरे झिजवुन गुन्हेगार काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. महसूल विभागाच्या डोळेझाक कारभारामुळे गुंडांवर वचक बसण्याऐवजी एक प्रकारे त्यांना बळ मिळते आहे.
तालुक्यातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलीस त्यांचे शर्थीचे प्रयत्न करतात. परंतू महसूल विभागाकडून गंभीर दखल न घेतल्याने पोलिसांवर हतबल होण्याची वेळ येऊ लागली आहे.
बेकायदा मटका, मद्यविक्री या धंद्यांना पोलीस आळा घालतात. वेळोवळी कारवाई करतात. परतू महसूल विभागाच्या अखत्यारित गुन्हेगारीला पायबंद घालण्याचे प्रयत्न होत नाहीत. बेकायदा वाळू उपसा, उत्खनन, काळ्या बाजाराने धान्य विक्री हे अवैध धंदे राजरोसपणे तालुक्यात सुरू आहेत. हे अवैध धंदे बंद करण्याची आग्रही मागणी करणारे तथाकथित स्वयंघोषित कार्यकर्ते महसूल विभागातील गैरकारभाराबद्दल आवाज उठवित नाहित. महसूल विभागाच्या अधिका-यांशी लागेबांधे आणि सलोख्याचे त्यांचे संबंध असावेत, असा संशय नागरिकांना येत आहे.
तालुक्यातील कार्यकर्त्यांची कार्यपद्धतीतील विसंगती दृष्टीपथास येत आहे. त्यांच्यातील याच संबंधामुळे कार्यकर्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असा दुहेरी मुखवटा परिधान केलेल्यांना महसूल खात्याच्या अधिका-यांकडून अभय देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे काहींचे तडिपारीचे प्रस्ताव पुढे सरकत नाहित. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर अशा व्यकतींविरूद्धच्या कारवाईचे पाऊल उचलण्यास अधिकारी धजावत नाहित. अधिका-यांची ही वर्तणूक तालुक्यातील गुन्हेगारी वाढविण्यास पोषक ठरू लागली आहे. नागरिकांमध्ये मात्र त्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.