निर्भीडसत्ता न्यूज –
भ्रष्टाचाराच्या आरोपातून ए. राजा, कनिमोळी निर्दोष सुटले की न्यायव्यवस्था सुरक्षित असते. कर्नल पुरोहित निर्दोष सुटल्यास न्याव्यवस्था धोक्यात कशी? येते. संविधानाने संसद, सरकार आणि न्यायवस्थेला एकत्रित बांधले आहे. लोकसभा चालू दिली जात नाही. न्याय पालिकेवर संशय व्यक्त करत सरन्यायधीशावर महाभियोग आणला जातो. संसद चालू देणार नाही, न्याय व्यवस्था चालू देणार नाही. याला माफिया म्हणतात. मग, आता संविधान कोणापासून वाचवायचे आहे, याचा सुजान जनतेने विचार करावा. संविधान बचाव म्हणणा-यांनी अगोदर संविधान समजून घ्यावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि ‘जागता पहारा’ या एकमेव ब्लॉगचे लेखक भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच राज्य घटनेत बदल करण्याची तरतूद ठेवली असल्याचेही, त्यांनी सांगितले.
निगडीतील, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 1 ते 5 मे या कालावधीत 34 व्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे “संविधान वाचवा – परंतु कोणापासून ?” या विषयावरील दुसरे पुष्प बुधवारी (दि.2) भाऊ तोरसेकर यांनी गुंफले. दि.कल्याण जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक अनंत कुलकर्णी, सावरकर मंडळाचे सचिव भास्कर रिकामे, किसन महाराज चौधरी, रत्नाकर देव, महेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, अच्युत होनप, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
”गांधीवाद, फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र ही आता ‘फॅशन’ झाली आहे. ही फॅशन 20 ते 30 वर्षापूर्वी आली. यापूर्वी शिवाजी महाराज, टिळक, आगरकर यांचा महाराष्ट्र होता असे” सांगत भाऊ तोरसेकर म्हणाले, ”गांधी स्मारकाच्या निधीवरुन वाद केला जातो. न्यायालयापर्यंत तो वाद पोहचतो. त्यांना गांधी कसले समजले आहेत. स्वदेशीचा नारा गांधी यांनी दिला होता. परंतु, गांधीवादी स्वदेशीचा अवलंब करत नाहीत. रामदेव बाबा स्वदेशीचा अवंलब करत आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये मराठीतील पहिले दर्पण हे दैनिक वर्तमानपत्र सुरु केले. त्यावेळी दर्पणची किंमत एक रुपया होती. ज्यावेळी दोन ते तीन रुपये रोजगार होता. आता एक रुपयात वर्तमानपत्र देण्याची स्पर्धा लागली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांना माहित होते की आपण जो माल देतो, त्याची किंमत आहे. परंतु, आता वर्तमानपत्रे वाचनीय राहिली नाहीत”.
”पुरस्कार वापसी पुरस्कृत होती. केवळ साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात होते. परंतु, एकाही ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्याने आपला पुरस्कार परत केला नाही. त्याची बातमीही झाली नाही. केवळ साहित्य अकादमीची बातमी होते असे सांगत” तोरसेकर पुढे म्हणाले, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर मार्क्स, कमिन्युस्ट शिकविला जातो. मग संविधानाला धोका नेमका कोणापासून आहे. घटना बदलायची नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. भारतातील लोकशाही घटनेमुळे टिकून आहे. घटना बदलू नये हा आंबेडकरवाद आहे. तर, घटना बदलावी हे आंबेडकरवादी आहेत. बाबासाहेबांनी घटना बदलण्यासाठीच घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे. आजपर्यंत अनेकदा घटनेत बदल करण्यात आला आहे. परंतु, आता केवळ त्यांचे भांडवल करत संविधान बचाव म्हणून मोर्चे काढले जात आहेत. डॉ. बाबासाहेबांना निवडणुकीत काँग्रेस, कमिन्यूस्टांनी पाडले. आज ते फुले-शाहु-आंबेडकरांचे नाव घेत आहेत. डॉ. बाबासाहेबांना राज्यसभेत निवडून येण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मदत केली होती”.
”कालपर्यंत मोदी यांना व्हिसा नाकारणारे आज गळाभेट घेत आहेत. ही कसली सभ्यता आली. आज जर शाहू महाराज असते तर त्यांनी कोणाची बाजू घेतली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील एक ते दोन मुद्दे घेऊन टीका केली जाते. संपूर्ण भाषण दाखविले जात नाही. शाहू महाराज यांची देखील त्यावेळी हीच तक्रार होती. महात्मा फुले यांच्या अंगावर शिंतोडे फेकणारे ब्राम्हण नव्हते. पाप, पुण्यावर बोलणारे पुरोगामी आहेत. सेक्युलरचे जाणवे गळ्यात घातले की त्याला विचारणारे कोण राहत नाही”, असेही तोरसेकर म्हणाले.
”डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलासाठी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हिंदू धर्म सुधारावा, ही त्यांची भूमिका होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या पाठीशी नेहरु उभे राहिले नाहीत. नागरिकांनी आपण हिंदू असल्याचे ठणकावून सांगितले पाहिजे. हिंदू धर्मात देवाला देखील अंतिम मानत नाहीत म्हणून हा धर्म आवडत असल्याचे” सांगत ते पुढे म्हणाले, ”कोणत्याही पक्षाच्या मेहरबानीने हा देश सेक्युलर राहिला नाही. देशात हिंदू समाज जास्त आहे. त्यामुळे हा देश सेक्यूलर आहे. त्यासाठी हिंदू धर्म वाचला पाहिजे हे ठणकावून सांगणे गरजेचे आहे”, असेही ते म्हणाले.
मान्यवरांचा परिचय उज्वला केळकर व माधुरी ओक यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. अजित जगताप यांनी केले.