विलासबाबा जवळ यांचा व्यसनमुक्तीसाठी ‘दारूजाळ’ आंदोलनाचा निर्धार; दुर्जनाविरूद्ध सज्जनांचा लढा
निर्भीडसत्ता न्यूज –
सामाजिक ध्येयाने प्रेरित झालेला एक कार्यकर्ता व्यसन मुक्तीचे कार्य हाती घेतो. केवळ व्यसनमुक्तीचे धडे दिल्याने समाजात बदल होणार नाही, हे लक्षात येताच दारूबंदीविषयी आवाज उठवितो. नागरिकांच्या सहकार्याने तालुक्यात दारूबंदीचा निर्णय होतो, परंतू काही समाजविघातक वृत्तीच्या लोकांकडून गावोगावी दारू विक्रीला बळ मिळते. हतबल अधिकारी काही करू शकत नाहीत, अशा वेळी संयमी असलेला कार्यकर्ता आक्रमक भूिमका घेऊन व्यसनमुक्तीसाठी ‘दारूजाळ’ आंदोलनाचा निर्धार करतो. विलासबाबा जवळ असे त्या कार्यकर्त्याचे नाव असून त्याने एक प्रकारे क्रांतीकारक ‘एल्गार’ पुकारला आहे.
व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून विलासबाबा जवळ अनेक वर्षांपासून जावळी तालुक्यात काम करीत आहेत. तरूणांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे. विविध ठिकाणी मार्गदर्शनपर शिबीर, उपक्रम घेऊन ते व्यसनमुक्तीची जनजागृती करीत आहेत. एकीकडे तरूणांना व्यवसनापासून दूर नेण्याचा प्रयत्न होत असताना, त्यांना व्यसनाच्या आहारी नेणारे समाजकंटक तयार होत आहेत. दारूबंदी असताना, गावोगावी हातभट्टी विक्री सुरू आहे. अशा अवैध धंद्यातील समाजकंटकांवर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई होते. तडिपारीसारख्या प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलले जाते. मात्र राजकीय दबाव, मनी पॉवरचा उपयोग होत असल्याने प्रस्ताव पुढे सरकत नाहित. अधिका-यांच्या हतबलतेमुळे या समाज कंटकांवर अंकुश राहत नाहीत. कायद्याला न जुमानण्याचे धाडस ते दाखवतात. त्यांच्याविरूद्ध कोणी सामान्य माणूस आवाज उठविण्यास धजावत नाही. अशा परिस्थितीत काय व्हायचे ते होवू दे असा निर्धार करून विलासबाबांनी आंदोलनाचे पुढचे पाऊल टाकले आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हां हतबल होतात तेव्हा देशकार्य म्हणुन प्रत्येक नागरीकाने आपले योगदान देणे महत्वाचे ठरते. या भुमिकेतून त्यांनी दारूजाळ अंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
विविध संघटनांची लेबल वापरून अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीची निवेदने देणारे, मोर्चे, आंदोलन करण्याचा इशारा देऊन खंडणी उकळणा-या स्वयंघोषित कार्यकर्त्यांमुळे तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहेत. हप्ते वसुली आणि खंडणीखोरीवर कुटूंबाचा उरनिर्वाह चालविणा-या स्वयंघोषित कार्यकर्त्यांवर विलासबाबा तुमच्या या आक्रमक भुमिकेमुळे उपासमारीची वेळ येणार आहे.
तालुक्यातील काही स्वयंघोषित कार्यकर्ते अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी मोर्चे, आंदोलन करण्याचे इशारे देतात. खंडणी घेण्यासाठी चक्क अवैध धंदेवाल्याकडे हेलपाटे मारतात. समाजाचं भलं कशात आहे, या जाणीवेतून त्यांनी काम केलं असतं तर विलासबाबांना आज हे पाऊल उचलण्याची वेळ आली नसती.
कायद्याच्या चौकटीत काम करायचे असल्यामुळे या गुंडापुढे पोलीस हतबल झाले आहेत. कोणत्याही खात्यात जशी लाचार माणसे असतात तशीच स्वाभिमानीही असतात. अशाच काही स्वाभिमानी पोलीस अधिका-यांनी कारवाईचा बडगा उगारला. परंतू जरब बसेल असे काही झाले नाही. त्याचे कारण गुंडांविरूद्ध आवाज उठविणा-या नागरिकांना पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, याचे कटू अनुभव आल्यानंतर गुंडाविरूद्ध तक्रार देण्यास कोणीच पुढे येत नाही. दबावाला बळी न पडता गुंडाविरूद्ध कायद्याच्या आधारेच पोलीस जेव्हा कठोर कारवाई करतील, तेव्हा पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास दृढ होईल.
कायद्याच्या रक्षकांची हतबलता लक्षात घेवून गंगाजल या चित्रपटातील धर्तीवर दारूजाळ आंदोलन हाती घेतले आहे. महाराष्ट्र दिनानंतर जावळीत कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी आंदोलन सुरू होईल. जावळी तालुका व्यसनमुक्त, भयमुक्त व्हावा, असे ज्यांना वाटते ते या चळवळीत योगदान देतील. हा दुर्जनाविरूद्ध सज्जनांचा लढा आहे. त्यात विजय सज्जनांचाच होणार आहे.