निर्भीडसत्ता न्यूज –
व्यसन, फॅशन आणि इलेक्शन यामुळे समाज मागे पडतोय. आजची पिढी सैराट झाली आहे. त्यामुळे पैसा असूनही आईवडिलांची त्यांना चिंता नाही. त्यासाठी संस्कारांची गरज आहे, असे मत चऱ्होलीकर हभप सतीशमहाराज काळजे यांनी व्यक्त केले.
अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. काळेवाडीतील ज्योतिबानगर येथील विष्णूराज मंगल कार्यालयाच्या विठ्ठलराज मंदिरात सप्ताहानिमित्त गुरुवार दि. 17 ते 24 मे दरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहेत. सप्ताहातील दुसऱ्या दिवसाचे कीर्तन हभप काळजेमहाराज यांनी सादर केले. संत तुकाराम महाराज यांचा लाडकी ‘विषय विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला’ या अभंगाचे निरुपण त्यांनी या वेळी केले.
सप्ताहाचे मुख्य आयोजन महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, नगरसेवक विनोद नढे, नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक कैलास थोपटे, बजरंग नढे, सखाराम नखाते, मधुकर काळे, तुकाराममहाराज हापसे, काळुराम काळे, बापूसाहेब ढमाले, गोरख कोकणे, लहू कोकणे, सामाजिक कार्यकर्त्या संगीता कोकणे आदी या वेळी उपस्थित होते. गायनाचार्य अशोक येवले यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
हभप काळजेमहाराज या वेळी म्हणाले की, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस सुखाच्या शोधासाठी धडपडत आहे. मात्र सुख पैशांत किंवा फॅशनमध्ये नाही. व्यसनांमध्येतर मुळीच नाही. असे असतानाही अनेक जण त्याच्या आहारी जातात. टीव्ही आणि मोबाईलमुळे आजची पिढी सैराट झाली आहे. अशा तरुणांकडे पैसा असला तरी त्यांना कुटुंब, नातेवाईक, आईवडील यांच्याबाबत प्रेम आणि आपुलकी नसते. त्यामुळे आजच्या पिढीवर संस्कारांची गरज आहे. त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे. महापुरुष आणि संतांचा आदर्श घेतला पाहिजे. संसारातील अनुभव कोणालाही सांगू नका; मात्र परमार्थ जगाला सांगितल्याशिवाय राहू नका. सुखाच्या शोधासाठी माणूस दिवसभर धडपडत असतो. ‘अतिथी देवो भव’ ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आपण आदरातीथ्य केले पाहिजे. आपला मोठेपणा आणि प्रतिष्ठा अशावेळी आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवावी.