निर्भीडसत्ता न्यूज –
पुरुषांच्याबरोबरीने महिला सर्वच क्षेत्रात काम करू लागल्या आहेत. महिलांनी उच्च स्थान गाठले आहे, अशा परिस्थितीत आजही घराण्याचा वंशज म्हणून मुलाकडे पाहिले जाते. ही बाब चिंतनीय आहे. समाजातील मुलींची संख्या घटण्याचे कारण ठरत आहे. मुला-मुलींचे प्रमाण समान असणे आवश्यक आहे. यातूनच समृद्ध आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती होणार आहे. यासाठी मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नका, असे मत आळंदीकर युवा कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज यांनी व्यक्त केले.
अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. काळेवाडीतील ज्योतिबानगर येथील विष्णूराज मंगल कार्यालयाच्या विठ्ठलराज मंदिरात सप्ताहानिमित्त गुरुवार दि. 17 ते 24 मे दरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहेत. सप्ताहातील सातव्या दिवसाचे कीर्तन हभप ज्ञानेश्वर महाराज यांनी सादर केले. संत नामदेव महाराज यांचा ‘हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास’ या अभंगाचे निरुपण त्यांनी या वेळी केले.
सप्ताहाचे मुख्य आयोजक महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काटे, कैलास बारणे, विनोद नढे, चंद्रकांत नखाते, उषा काळे, सुरेश भोईर, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, दिलीप काळे, रमेश काळे, सुनील कुंजीर, देवाअप्पा नखाते, श्रीधर वाल्हेकर, बजरंग नढे, सुदाम नखाते, मोहन कस्पटे, गणेश कस्पटे, दिलीप जाधव, संगीता पवार, विद्या माचुत्रे, सखुबाई नढे, विजय काळे, शरद नखाते, लहू कोकणे, काळुराम काळे आदी या वेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर आणि बेबीताई तापकीर या दाम्पत्याचा या वेळी सत्कार करण्यात आला.
युवा किर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज या वेळी म्हणाले की, बालवयात होणारे संस्कार हे अधिक परिणामकारक असून ते आईवडिलांकडून होत असतात. संस्कार म्हणजे शिस्त, विनम्र भाव, थोरामोठ्यांचा आदर, माणुसकी. संस्कार ही एक मनाची परिभाषा आहे. मनाची अवस्था आहे. स्व पासून सुरू होणारा संस्कार कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आदर्शाप्रत पोहचवू शकतो.
पती – पत्नीमध्ये एक विचार असले पाहिजेत. घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार केला पाहिजे. पतीने पत्नीने केलेल्या कामाचे कौतुक करायला पाहिजे. या महाराष्ट्राची माती पवित्र आहे. याच मातीत संत, राजे आणि महापुरुषांचा जन्म झाला आहे, म्हणून दानशूर व्यक्ती जन्माला आल्या पाहिजेत. त्यासाठी दानधर्म केला पाहिजे. व्यसनामुळे क्षणिक सुख मिळत असले तरी मानसिक, शारीरिक, आर्थिक व सामाजिक नुकसान होत असते. या देशातील युवकांना चांगली दिशा दिली तर समाज सुधारल्या शिवाय रहाणार नाही. स्वत:चे जीवन स्वच्छ असले पाहिजे आणि यासाठी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, त्यासाठी युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे.
मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, मुली शिकल्याने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे.