निर्भीडसत्ता न्यूज –
सत्ता, संपत्ती, तारुण्य, सौंदर्य आणि आयुष्य याचा कुणी अहंकार बाळगू नये. हे सारं यातील काही प्राप्त झाले तर त्याचा योग्य तो उपयोग करावा. आपण समाजव्यवस्थेचे एक घटक असून लोककल्याण हा आपला उद्देश असला पाहिजे, असे मत शिर्डीकर हभप नवनाथमहाराज मस्के यांनी व्यक्त केले.
अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. काळेवाडीतील ज्योतिबानगर येथील विष्णूराज मंगल कार्यालयाच्या विठ्ठलराज मंदिरात सप्ताहानिमित्त गुरुवारी (दि. 24) सप्ताहातील काल्याचे कीर्तन हभप नवनाथमहाराज मस्के यांनी सादर केले. संत तुकाराम महाराज यांचा ‘कोणी एकी भुलली नारी, विकितां गोरस म्हणे घ्या हरी’ या अभंगाचे निरुपण त्यांनी या वेळी केले.
पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, सप्ताहाचे मुख्य आयोजक ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, रोहिदासमहाराज हांडे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, शत्रुघ्न काटे, विनोद नढे, संतोष कोकणे, स्वीकृत सदस्य संदीप नखाते, विनोद तापकीर, अविनाश गायकवाड, तुकाराममहाराज हापसे, माजी नगरसेविका अनिता तापकीर, सखाराम नखाते, बजरंग नढे, शंकर नढे, बाळासाहेब वाल्हेकर, अंकुश राजवडे, इंगवले महाराज, मनोहर भोसले, सुदाम कापसे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी काळेवाडीतील जय हनुमान भजनी मंडळ यांचा सत्कार करण्यात आला.
हभप नवनाथमहराज या वेळी म्हणाले की, स्त्री भूण हत्येला अटकाव घालणे हि आजच्या काळाची गरज आहे. आजच्या परस्थितीत माणूससुद्धा राक्षसाला लाजवेल असे कृत्य करत आहे, स्वता: बापच मुलीला जन्माला येण्याअगोदर मारण्याची सुपारी घेत आहे. स्त्री भूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. आजच्या युगात संस्कृती बिकट होत चालली आहे. लहानपणी आई अंगाई गीत गात असायची आज मात्र अंगाई गीताची जागा मोबाईलने घेतली आहे. मुलांकडे लक्ष द्या, लहान मुलं कुमकुवत होत चालली आहेत. विशिष्ठ वयामध्ये मुलांना मैदानी खेळ खेळू दिले पाहिजेत. लहान वयातच मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, त्यासाठी मुलांवर संस्कार करा.
‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. पर्यावरणाच्या असमतोलामुळे आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक व्यक्तीने या सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. झाड तोडणाऱ्या हातांपेक्षा झाडे लावणारे हात निर्माण करुया आणि वृक्ष लागवड करुया, असे आवाहनहीहभप नवनाथमहराज यांनी केले.
या वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते हभप नवनाथमहराज मस्के यांचा सत्कार करण्यात आला. सप्ताहाचे आयोजन महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार बजरंग नढे यांनी मानले.