शशिकांत लिमये, रमेश राव यांचे मत; विलो मॅथर प्लॉट कंपनीत मेट्रोसंवाद उत्साहात
निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे मेट्रोचा पहिला टप्पा सुरु झाला असून पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असा मेट्रोमार्ग असणार आहे. या दोन्ही मार्गांचे काम सुरू असताना तसेच काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोतून प्रवास करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याबाबत महामेट्रो सातत्याने सजग आहे. काम सुरू असताना त्याबाबत नागरिकांना अडथळा येणार नाही आणि पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रवास सुरक्षित होईल. तसेच सध्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा नागरिकांना जो मनस्ताप सहन करावा लागत आहे, तो मेट्रोच्या येण्याने होणार नाही, असे मत पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये, मेट्रो कमिटी सदस्य रमेश राव यांनी व्यक्त केले.
पुणे मेट्रोबाबत माहिती देण्यासाठी चिंचवड येथील विलो मॅथर प्लॉट कंपनीत पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) आणि कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रोसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एसकेएफ, थिसन कृप, सीआयआय, आयटीआय, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट, विलो कंपनीतील अधिकारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना लिमये आणि राव बोलत होते.
शशिकांत लिमये म्हणाले, ” पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरात सार्वजनिक वाहतूक सुविधा वाढविणे गरजेचे आहे. दररोज पीएमटी, बीआरटी बसेस बिघाड झाल्याने नागरिकांची वाताहत होते. सुरु आहेत त्यांच्यामध्ये अतोनात गर्दी होत आहे. लोकलच्या मर्यादित फे-या असल्याने लोकलच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. सायंकाळी 7 च्या लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नसते. अशा वेळी वृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांची खूप वाताहत होते. अशा वेळी मेट्रोचा पर्याय अगदी महत्वपूर्ण ठरतो. मेट्रोच्या एका डब्यात एका वेळी 300 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. तर एका तासात 60 हजार नागरिक मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या आपोआप घटेल, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, वाहतूक कोंडी, असुरक्षितता यांपासून नागरिकांना मुक्ती मिळेल”
कंपनीच्या वतीने कंपनीतील कामगार व अधिका-यांसाठी रक्तदान शिबीर, कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज योजना, वृक्षारोपण कार्यक्रम, महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम, सांस्कृतिक सण-उत्सव साजरे करणे आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. कामगारांच्या हिताला प्राधान्य देत कंपनी वाटचाल करीत आहे, अशी माहिती एच आर हेड सुनील कोदे यांनी दिली. विकास कुलकर्णी यांनी आभार मानले.