निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिका निवडणुकीत वाकड-पिंपळेनिलख, प्रभाग क्रमांक २६ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. सत्ताधारी भाजपकडून होत असलेल्या विकासकामांमुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा तिळपापड झाला आहे. हीच विकासकामे भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी अडचणीचे ठरतील म्हणून शिवसेनेकडून आरोपांचे राजकारण केले जात आहे. चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा होणारा अपुरा पुरवठा लक्षात घेऊन या मतदारसंघात नवीन बांधकामांना परवानगी न देण्याच्या निर्णयावरूनही शिवसेना राजकारण करत आहे, असा आरोप भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केला आहे. विकासकामांमध्ये राजकारण करण्याऐवजी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या नेतृत्वाबाबत आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्याच पक्षातील नेत्यांना व स्वतःच्या पॅनलमधील नगरसेवकांना विश्वासात न घेता निर्णय घेतात. तशी संस्कृती भाजपमध्ये नाही. भाजपमध्ये एकमताने निर्णय घेतले जातात. चिंचवड मतदारसंघातील नवीन बांधकामांना तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम परवानगी न देण्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. परंतु, बिल्डरधार्जिण्या नेत्यांना हा निर्णय अयोग्य वाटत आहे. लाखो रुपये देऊन फ्लॅट विकत घेणाऱ्या व सर्व सामान्य लोकांपर्यंत सामान पाणी मिळावे या हेतूने घेतलेला हा निर्णय आहे. बांधकाम परवानगीसाठी कोण कोणत्या बिल्डरांची फाईल महापालिकेकडे दाखल आहे. त्यामध्ये कोण कोण भागीदार आहे याची पडताळणी करून घ्यावी व त्याचा फायदा कोणाला होणार आहे हेही तपासावे.
सध्या वाकड परिसराला दररोज ९ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. या भागात छोट्या मोठ्या ७०० सोसायट्या आहेत. त्यामध्ये सुमारे १६ हजार फ्लॅट आहेत. त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा हिशोब केल्यास या भागाला दररोज १० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. वाकडमध्ये बैठी घरे व गावठाण व झोपडपट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा विचार केल्या १० एमएलडीपेक्षा जास्त पाणी द्यावे लागणार आहे.
महापालिकेने २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात वाकड भागातील १५१ नवीन बांधकामांना परवानगी दिली. त्यानुसार याठिकाणी नव्याने ३ हजारहून अधिक फ्लॅट तयार होणार आहेत. त्यामध्ये नागरिक राहायला आल्यानंतर आणखी २ एमएलडी पाणी पुढील दोन वर्षांमध्ये वाढणार आहे. त्यामुळे सध्या या भागात राहणाऱ्या नागरिकांना समान पाणी देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
मोशी, डुडुळगाव, चिखली, चऱ्होली या भागाला सध्या दररोज १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्या मानाने तेथे लोकसंख्येचा विचार केल्यास सध्या केला जाणारा पाणीपुरवठा व्यवस्थित आहे. या भागात नवीन बांधकामांना परवानगी दिली, तरी तेथे पाणीपुरवठ्याचे नियोजन होऊ शकते. तसेच महापालिकेला महसूलही मिळणार आहे. चिंचवड मतदारसंघातील बांधकामांना परवानगी न देण्याचा निर्णय तात्पुरता आहे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यानंतर या मतदारसंघातील बांधकामांना पुन्हा परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयावरून राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.