पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भामा आसखेड प्रकल्पांतर्गत धरण क्षेत्रात कपात होणा-या ५३३९. १९ हेक्टर सिंचन क्षेत्राच्या पुन:स्थापन खर्च माफ करावा, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
इंद्रायणी नदीच्या परिसरातील भाग नव्याने विकसित होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली, च-होली, वडमुखवाडी, दिघी, मोशी आदी भागाच्या यामध्ये समावेश होतो. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी भामा आसखेड धरण क्षेत्रातील कपात होणा-या ५३३९.११ हेक्टर सिंचन क्षेत्राच्या पुन: स्थापना खर्चापोटी रुपये ७९३३.९२ लाख रुपये जमा करुन करारनामा करावा, असे पत्राद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला कळवले आहे. मात्र, सध्यस्थितीला शहरात मूलभूत सोई-सुविधा तसेच पायाभूत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला सिंचन क्षेत्राच्या पुन:स्थापना खर्चासाठी ७९३३.९२ लाख रुपये खर्च महापालिका अर्थसंकल्पातून अदा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा खर्च माफ करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.