निर्भीडसत्ता न्यूज –
पोलादपूर – महाबळेश्वर मार्गावरील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दाभीळ टोक येथे आंबेनळी घाटात खासगी बस कोसळून झालेल्या अपघातात ३३ प्रवाशी ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. तर अपघातातून सहाय्यक अधीक्षक प्रकाश सावंत देसाई बचावले आहेत. त्यांनीच या अपघाताची माहिती दिली.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठची बस पोलादपूरहून महाबळेश्वरला जात असताना सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास दाभीळ टोक येथे राज्य मार्गावर असलेल्या धुक्यामुळे चालकांना पुढील रस्ता दिसला नाही. यामुळे झालेल्या अपघातात बस दरीत कोसळली. यात बसमधील ३३ जण ठार झाले.
या अपघाताचे वृत्त समजताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, कशेडी महामार्ग पोलिस, खेड येथील मदत ग्रुप, महाबळेश्वरचे सह्याद्री ट्रेकरसह शासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्यावर धुके असल्याने मदतकार्यात अडथळे येत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दापोली येथून सदरची बस निघाली होती. पोलादपूरमार्गे महाबळेश्वरकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेचे वृत्त समजताच रायगडचे पालकमंत्री रविद्र चव्हाण घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचारी आणि 2 चालक- वाहक असे एकूण 40 जण होते. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.
आंबेनळी घाटामध्ये धुकं मोठ्या प्रमाणावर असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले आहेत.