निर्भीडसत्ता न्यूज –
दिल्ली जंतर-मंतर येथे काही मनूवादी प्रवृत्तीच्या लोकांनी भारतीय संविधानाचा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान केला असून यामध्ये या मनुवादी प्रवृत्तीने भारतीय घटनेचे पुस्तक जाळून देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. तसेच या विकृत मानसिकतेच्या लोकांनी आंबेडकर मुर्दाबाद, मनुवाद झिंदाबाद अश्या विषारी घोषणा दिल्लीमधे दिल्या आहेत.या झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी (दि.१२) सायंकाळी ६ वाजता पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा या ठिकाणी आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धीपत्रक सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिले आहे.
या देश विघातक कार्यक्रमात सामील होऊन ज्या लोकांनी हे कृत्य केले आहे. ते कोणीही असो त्यांच्यावर केंद्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर शासन करावे. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे पुण्यात असताना शिव प्रतिष्ठानचे मनोहर भिडे गुरुजी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या विचारांपेक्षा मनुचा विचार एक पाउल पुढे होता असे सांगून मनुस्मृतीचे समर्थन केले होते. तसेच राजस्थानच्या विधीमंडळासमोर मनुचा पुतळा असून संविधान निर्माण करण्यासाठी मनुनेच मला स्फूर्ती दिली. हे त्या पुतळ्या खाली दगडी फरशी वर कोरले आहे. तसेच संविधान सभेमध्ये देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीची स्तुती केली होती. असे जाहिर खोटारडे वक्तव्य मनोहर भिडे गुरुजींनी केले होते.
या दोन्ही घटनांचा निषेध तसेच या विषयाबाबत सर्वांशी विचार विनिमय करून आंदोलनाची पुढील दिशा याच बैठकीत ठरेल. पिंपरी येथे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, भारतीय नागरिकांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन भापकर यांनी केले आहे.