लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : स्थापत्य-अग्निशमन विभागाची टोलवाटोलवी
निर्भीडसत्ता न्यूज –
चिखलीतील वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या भागात अग्निशमन उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. मागील सहा महिन्यांपासून अधिकाऱ्यांकडून आठवडा, पंधरा दिवसात केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या स्थापत्य व अग्निशमन विभागाच्या नियोजनाअभावी हे केंद्र रखडले आहे. तर, परिसरातील लोकप्रतिनिधींकडून उपकेंद्र सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत आहे..
चिखली परिसरात भंगार गोदामे आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. तिथे आगीच्या घटना वारंवार घडतात. त्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून चिखली परिसरात अग्निशमन उपकेंद्र उभारण्याचे नियोजन सुरू आहे. हे उपकेंद्र सुरू झाल्यास चिखली, तळवडे, मोशी आणि एमआयडीसी भागातील आगीच्या घटनांवर वेळेत नियंत्रण मिळविण्यासाठी निश्चित फायदा होणार आहे. तर या उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून वारंवार सांगण्यात येते. मार्च २०१८ मध्ये पंधरा दिवसात उपकेंद्र सुरू करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर व अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानंतर सहा महिने उलटले. त्यात अग्निशमन विभागाची जबाबदारी दुसरे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे गेली. परंतु, अजूनही हे उपकेंद्र पालिका सुरू करू शकलेली नाही..
चिखली परिसरातून महापालिकेत महापौर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने हे प्रमुख पदाधिकारी आहेत. तर, आमदार महेश लांडगे यांचेही चिखलीत लक्ष आहे. मात्र, उपकेंद्र सुरु करण्याकडे या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाकडून या कामाला गती दिली जात नाही. या भागाची गरज लक्षात घेता उपकेंद्र तातडीने सुरू करणे गरजचे आहे..
पाण्याच्या टाकीअभावी चिखली उपकेंद्र सुरू करता येत नव्हते. स्थापत्य विभागामार्फत पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून ते पुर्ण होताच आगामी पंधरा दिवसात उपकेंद्राच्या उद्घाटनाचे नियोजन सुरू आहे. केंद्रासाठी कर्मचारी वर्ग करण्यात आलेले आहेत.
किरण गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी.