शाहूनगरमध्ये संविधानपर व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प गुंफले
निर्भीडसत्ता न्यूज –
सर्वोत्तम व परिपूर्ण असलेल्या भारतीय राज्यघटनेला एक मूलभूत चौकट आहे. देशातील सर्व जाती, धर्म, पंथांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचे काम संविधान करत असल्यामुळे संविधान बदलण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे देशातील एकात्मता अबाधित राखण्याचे सामर्थ्य या भारतीय संविधानात असल्याचे मत दै. पुण्यनगरीच्या मुख्य संपादक राही भिडे यांनी व्यक्त केले.
चिंचवडच्या शाहूनगर येथे पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व संविधान दिन सोहळा समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजित संविधानपर व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प गुंफताना ‘भारतीय संविधान आणि राजकीय संहिता’ या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. लक्ष्मण रानवडे होते. यावेळी सुरेश कसबे, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आदी उपस्थित होते.
राही भिडे पुढे म्हणाल्या, देशातील विविधतेला एका धाग्यात बांधून ठेवण्याचे सामर्थ्य संविधानात आहे. ते नको असल्यामुळे जातीयता पोसली जात आहे. विषमतामूलक समाज व्यवस्थेत राज्यघटना शाबूत राहिल्यास देश व या देशातील एकात्मता टिकून राहील, अन्यथा देशात अराजकता माजेल. मात्र, संविधानाचा पाया नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने देशातील नागरिक म्हणून सर्वांनी जागरूक होणे गरजेचे आहे. संविधानाने न्यायव्यवस्था दिली आहे, परंतु त्याला जात पंचायती, खाप पंचायती, शरियत न्यायालयाच्या माध्यमातून संविधानिक न्याय व्यवस्थेला पर्यायी न्याय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जात पंचायती सामाजिक अन्यायाची दुकाने आहेत. त्यात कायम महिलांनाच दोषी ठरवून त्यांच्यावर अन्याय केला जातो. दहशत पसरवून समाजाला दोन हजार वर्षे पुन्हा मागे नेण्याचा प्रयत्न होतोय. या मानसिकतेला आळा घातला पाहिजे. संविधानानुसार जे होत नसेल, त्याचा भारतीय नागरिक म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने प्रतिवाद करायला हवा. भारतीय नागरिक म्हणून सर्व बहुजन समाजाला एकत्रित आणून जनजागृती करणे गरजेचे आहे. आदर्श समाज व राष्ट्रनिर्मितीसाठी हे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
रतन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कैलास लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. तर, प्रवीण गायकवाड, विष्णू मांजरे, विजय गेडाम, राहुल आंबोरे, राजू उबाळे यांनी संयोजन केले.
“लोकशाही, संविधान टिकवण्यासाठी एकजूट महत्त्वाची”
भारतात लोकशाही नावापुरती आणि फक्त पंचवार्षिक निवडणुकांपुरती राहील काय ? सत्ता बदल हा खरा परिवर्तनवादी असेल का, असे प्रश्न उपस्थित करत संसदीय लोकशाहीशी समाजाला काही घेणं-देणं राहणार नाही, ही भीती बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. ती एका दृष्टीने खरी ठरत आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान टिकवण्यासाठी एकजूट महत्त्वाची असल्याचेही राही भिडे यांनी म्हटले.