निर्भीडसत्ता न्यूज –
महागणपतीच्या आशीर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभू रामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न होता पूर्णत्वास यावे, असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाचरणी अभिषेकातून घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती असे सांगत गणरायाकडे जे मागितले ते त्यालाच माहीत आहे, असेही त्यांनी मिष्कीलपणे सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात मोहन भागवत यांनी गणरायाची आरती आणि अभिषेक केला. अभिषेकाचे पौरोहित्य करणाऱ्या मिलिंद राहुरकर गुरुजींनी केलेल्या मंत्रपठणाला साथ देत भागवत यांनी राममंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना केली. श्री विघ्नहर्त्याच्या उपासनेतून कष्ट, विघ्न दूर व्हावेत, संस्कार करावेत अशा प्रकारच्या औचित्यपूर्ण दिशेने चाललेले दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कार्य पाहून आनंद वाटला. समाजाची धारणा करणारा धर्म हाच आहे. आत्मसाधना व लोकसेवा या दोन्हींचे परिपूर्ण केंद्र यातून आपले मंदिर बनावे, असा लेखी शुभेच्छा संदेश त्यांनी अभिप्राय म्हणून गणपती सदन येथे दिलेल्या भेटीदरम्यान दिला.