निर्भीडसत्ता न्यूज –
स्मशानभूमी आणि तेथील उद्यानात काळजीवाहक, रखवालदार आणि माळी पुरविण्याची तब्बल साडेनऊ कोटींची निविदा मागविण्यात आली होती. त्यात दोन ठेकेदारांचे दर सारखेच आल्याने त्यांना समसमान काम वाटून दिले आहे. प्रशासनाच्या हा प्रकार शंकास्पद ठरत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने स्मशानभूमीमधील दैनंदिन स्वच्छता, साफसफाई, देखरेख, सुरक्षा आणि माळी कामासाठी ठेकेदारी पद्धतीने कामगार पुरविण्याबाबत निविदा प्रसिद्ध केली होती. पालिकेच्या ‘अ’, ‘क’, ‘ई’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्व 12 स्मशानभूमी व तेथील उद्यानासाठी ही निविदा आहे. या 3 वर्षे कालावधीच्या कामासाठी 48 काळजीवाहक, 48 रखवालदार आणि 12 माळी असे एकूण 108 कामगार पुरविण्याची अट आहे.
त्या कामासाठी जयभवानी इंटरप्रायजेस व शुभम उद्योग या दोन ठेकेदार एजन्सीने 9.19 टक्के कमी दराने 9 कोटी 24 लाख 3 हजार 348 या समान रक्कमेची निविदा भरली आहे. ठेकेदारांशी चर्चा करून दर कमी करणे. ती निविदा रद्द करणे नव्याने राबविण्याबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट, प्रत्येक ठेकेदाराला 24 काळजीवाहक, 24 रखवालदार व 6 माळी असे एकूण 54 कामगार पुरविण्यास सांगण्यात आले आहे.