कोल्हापूर – जिल्ह्यात गेले दोन दिवस धुवाँधार पाऊस पडत आहे यामुळे काही भागात रेड आणि ऑरेंज अॅलर्ट देण्यात आाल आहे. मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांनी वाढ झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्यात बुधवार(दि. 21) व गुरुवार (दि. 22) या दोन दिवसांकरिता रेड आणि ऑरेंज अॅलर्ट दिलेला आहे.
15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या कालावधीमध्ये अतिपाऊसमान (प्रतिदिन 70 ते 150 मि.मी. किंवा त्याहून जास्त) होण्याची शक्यता आहे.विशेषत: जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले आहे.तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि दिवसभर भुरभुर पाऊस होता. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते.त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. दिवसभरात गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या.रात्री उशिरापर्यंत संततधार सुरू होती. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 131.44 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा- राधानगरी 4.64, तुळशी 2, वारणा 25.14, दूधगंगा 12.5, कासारी 1.92, कडवी 1.37, कुंभी 1.97, पाटगाव 2.55 असा पाणीसाठा आहे.