सातारा : निर्भीडसत्ता न्यूज
राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेनंतर आता शिंदे गटाने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळविला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीमधील अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी केला. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आठ पैकी चारच आमदार शिल्लक राहिल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना सातारा जिल्ह्यात २०२४ मध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाल्याचे दिसेल, असेही देसाई म्हणाले. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मॉलमध्ये वाईन विक्रीबाबत देसाई यांनी भाष्य केले. मॉलमध्ये वाईन विक्री संदर्भात राज्यात वादंग निर्माण होईल,असे विधान मी केलेले नाही. तत्कालीन ठाकरे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. यासंदर्भात जनतेचा अभिप्राय आणि जनतेचे मत मागण्यासाठी लोकांच्या हरकती मागविल्या आहे. अहवाल जेव्हा माझ्याकडे येईल त्यावेळेस मी स्वतः त्यावर माझं मत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समक्ष मांडेल, असे देसाई म्हणाले.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिली. यावर न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने बीकेसीत दसरा मेळाव्याचे आयोजन करणार आहोत. आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचे सोने लुटण्याचा अधिकार आहे,असे देसाई म्हणाले.