निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मध्ये काम करणा-या १४ अपंग कर्मचा-यांची सेवा संपृष्टात आणण्यात आली आहे. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत त्या कर्मचा-यांना पुन्हा सेवेत घेण्यास स्थायी समितीने बजावले आहे.
पीएमपीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या प्रशासनाने ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी कार्यालयीन आदेशान्वये पीएमपीच्या १४ कर्मचा-यांची सेवा संपुष्टात आणली आहे. त्या सर्व कर्मचा-यांना अंपगत्वाचे कारण देत त्यांची सेवा संपुष्टात आणण्यात आली. या कर्मचा-यांना सेवा बजावताना अंपगत्व आले आहे. त्यात त्यांची काय चूक आहे, असा प्रश्न स्थायी समितीच्या सदस्या आशा शेंडगे यांनी उपस्थित केला. पीएमपीएमएल पालिका पैसे देते. त्यामुळे प्रशासनाने कोणतेही निर्णय घेताना. किमान संचालक मंडळाला विचारात घ्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
याबाबत १४ अपंग कर्मचा-यांना त्यांच्या क्षमतेनुसार हलके काम दिले जात होते. मात्र, पीएमपी प्रशासनाने ते काम बंद करुन त्यांना कामावरुन काढले आहे. कामावरुन काढताना कर्मचा-यांना कोणतीही कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे या कर्मचा-यांवरील कारवाई मागे घेऊन त्यांना कामावर घ्यावे, असा निर्णय स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे यांनी घेतला. तसेच, तुकाराम मुंढे यांना पत्र पाठविण्यात येणार असून आयुक्त श्रावण हार्डीकर देखील मुंढे यांना पत्र पाठविणार असल्याचे सावळे यांनी सांगितले.