निर्भीडसत्ता न्यूज –
चिखलातील, जाधववाडी येथील शाळेत शिकणाऱ्या पाचवीतील विद्यार्थिनीला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्रष या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
जाधववाडीतील साई जीवन शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने बेदम मारहाण केली. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड आणि बँकेत खाते सुरु करायला सांगितले होते. मात्र, पाचवीत शिकणाऱ्या संबंधित विद्यार्थिनीचे आधार कार्ड आणि बँक खात्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नव्हते. यामुळे ती घाबरली आणि दोन दिवस शाळेला दांडी मारली. दोन दिवसांनी ती शाळेत गेल्यावर शाळेतील शिक्षकाने तिला लाकडी पट्टीने मारहाण केले.
पीडित मुलीच्या दोन्ही हाताच्या दंडावर आणि तळ हातावर पट्टीचे वळ उमटले आहेत. संबंधित मूलगी ही मूळची उत्तर प्रदेशची असून गेल्या सात वर्षांपासून तिचे कुटुंबीय चिखली-जाधववाडी परिसरात राहतात.
याबाबत पालिकेचे शिक्षण अधिकारी बी.एस.आवारी यांना विचारले असता ते म्हणाले, मला याबाबत माहिती मिळाली आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका रजेवर आहेत. गायकवाड नावाच्या शिक्षिकेकडे कामकाज दिले असून मारहाण करणा-या केंगळे आणि गायकवाड या शिक्षिकेला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. चौकशी करून दोषी शिक्षकावर कारवाई केली जाईल.