निर्भीडसत्ता न्यूज –
कोल्हापूरात पंचगंगा नदीवरील पुलावरुन एक मिनी बस नदीत कोसळ्याने झालेल्या भीषण अपघातात पुण्यामधील १३ जण ठार झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.२६) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. कोकणातील गणपतीपुळे येथून देवदर्शन करुन कोल्हापूरमार्गे पुण्याकडे येत असताना हा अपघात झाल्याचे समजले. पुण्यातील बालेवाडीतील नागरिकांचा या अपघातात समावेश आहे.
संतोष बबनराव वरखडे (वय ४५). गौरी संतोष वरखडे (वय १५). ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (वय १४), सचिन भरत केदारी (वय ३४), निलम सचिन केदारी (वय २८), संकृती सचिन केदारी (वय ८), सानिध्य सचिन केदारी (वय ९ महिने), भावना दिलीप केदारी (वय ३५), साहिल दिलीप केदारी (वय १४), श्रावणी दिलीप केदारी (वय ११), छाया दिनेश नागरे (वय ४१). प्रतिक दिनेश नागरे (वय १४), अज्ञात वाहन चालक (वय २८) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर, मंदा भरत केदारी (वय ५०), प्राजक्ता दिनेश नागरे (वय १८), मनिषा संतोष वरखडे (वय ३८) अशी जखमींची नावे आहेत.
स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीपुळ्याहून पुण्याकडे जात असताना शिवाजी पुलावरुन मिनीबसला हा भीषण अपघात झाला आहे. पुलाचा संरक्षक दगडी कठडा तोडून बस १०० फूट खोल दरीत कोसळली. जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एकची कुटुंबातील १७ जण या बसमधून प्रवास करीत होते. आज पहाटे बस बाहेर काढण्यात अग्निशमनच्या जवानांना यश आले. केदारी, नांगरे, वरखडे ही तीन कुटुंबे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. मात्र, परतत असताना नदीत बस कोसळून हा भीषण अपघात घडला.