निर्भीड न्यूज –
पिंपरीतील एचए कंपनीचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजप सरकार सकारात्मक असल्याचे सांगत असेल, तर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर टीका करून कंपनी कामगारांची आणि जनतेची दिशाभूल का केली, याचे उत्तर द्यावे. कोणताही प्रश्न सोडविताना सरकार पातळीवर प्रक्रिया ठरलेली असते. त्याची जाण नसल्यामुळेच खासदार बारणे दुटप्पी भूमिकेत वावरत आहेत. अनधिकृत बांधकाम प्रश्नांबाबत आपले अज्ञान प्रकट करणारे खासदार बारणे आता एचए कंपनीच्या प्रश्नवरूनही सरकार पातळीवरील प्रक्रियेबाबत अज्ञानी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांनी केली.
एचए कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी गेल्या आठवड्यात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी एचएचा प्रलंबित प्रश्न न सुटल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचा निषेध केला. त्यामुळे भाजपनेही खासदार बारणे यांच्यावर टीका केली होती. आता बारणे यांनीच संसदेत एचएचा प्रश्न उपस्थित करून नंतर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली तसेच रसायन आणि खतमंत्री अनंतकुमार यांची भेट घेतली. या दोघांनीही एचएचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली आहे. त्यामुळे बारणे यांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख एकनाथ पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यासंदर्भात एकनाथ पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सरकार पातळीवर कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया ठरलेली असते. त्यानुसार भाजप सरकारने एचएचा प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, ही प्रक्रियाच माहित नसलेले शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी एचएच्या प्रश्नांबाबत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यामुळे रखडला असल्याची टिका करून सरकार पातळीवरील प्रक्रियेसंदर्भात आपण अज्ञानी असल्याचे त्यांनी जनतेला दाखवून दिले आहे. आता हेच खासदार एचएचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राकडून सकारात्मक पावले उचलण्यात येत असल्याचे सांगत आहेत. आधी एक सांगायचे आणि आता सरकार सकारात्मक असल्याचे सांगून आपण किती दुटप्पी आहोत, हे त्यांनीच सिद्ध केले आहे.”
ते म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना एचएच्या प्रश्नाचे केवळ राजकारण करण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते एचएच्या प्रश्नाचे निवेदने दिल्याचे फोटो छापून आणून प्रसिद्धीझोतात राहिले. परंतु, हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पातळीवर कोणतीही प्रक्रिया पार पाडली नाही. प्रत्येकवेळी केवळ आश्वासने दिली. मात्र भाजप सरकारने हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारी प्रक्रिया सुरू केली आहे. एचएचा प्रश्न कायमचा सोडविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा विषय केंद्रीय मंत्रीमंडळासमोर जाणार आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना कदाचित ही प्रकिया माहितीच नसावी. त्यामुळे त्यांनी भाजप सरकारवर टीका करून प्रसिद्धी मिळविली.”
ते म्हणाले, “एचएच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने आणि प्रवक्त्याने खासदार बारणे यांच्या सूरात सूर मिसळून भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत असलेली छुपी युती जनतेसमोर आली. राष्ट्रवादीने एचएच्या प्रश्नासंदर्भात निवेदने देण्यापलीकडे कोणती सरकारी प्रक्रिया पार पाडली आहे, हे जनतेसमोर ठेवावे. घोटाळे बहाद्दरांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना १५ वर्षे खाऊन पोट भरल्यानंतर आता एचएचा प्रश्न आठवू लागला आहे, ही एचएच्या कामगारांची शोकांतिका आहे. एचए कंपनीचा प्रश्न भाजपचेच सरकार सोडविणार आहे. त्यामुळे त्याचे श्रेय घेण्यासाठी आतापासूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीने हातात हात मिसळून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु, शहरातील जनता आणि एचएचे कामगार दुधखुळी नाही, याचे भान शिवसेना आणि राष्ट्रवादीने ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.”