निर्भीडसत्ता न्यूज –
संत तुकारामनगर, महेशनगर आणि इतर विविध ठिकाणी पिंपरी महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही परवानाधारक टपरी, हातगाडीधारकांवर नाहक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईविरोधात आज (सोमवार) महापालिकेवर टपरी, पथारी, हातगाडीधारकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंचायतचे शहराध्यक्ष रमेश शिंदे, सचिव प्रल्हाद कांबळे, धर्मराज जगताप, बळीराम काकडे, माऊली शिंदे, पवन परदेशी, संतोष परदेशी, प्रकाश बाळ, नियाज देसाई, हेमंत मोरे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.
संत तुकारामनगर येथून मोर्चाला सुरूवात झाली. केंद्र सरकारने टपरीधारकांच्या बाजूने कायदा केला आहे. पालिकेने स्वतंत्र उपविधी मंजूर केले आहे. या आधारे शहराताली सर्व हातगाडीधारकांना परवाना, ओळखपत्र आणि त्यांचे पक्क्या गाळ्यात पुनर्वसन करणे आदी कामे पालिकेने करावीत. अतिक्रमण कारवाई ताबडतोब थांबवावी, सर्वांना परवाना देण्यात यावा, बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.