निर्भीडसत्ता न्यूज –
आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर ते निगडी मार्गे आळंदी बससेवा सुरू करावी, अशी मागणी आकुर्डीतील आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्बात संघाने आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर आणि काळभोरनगर या भागातील नागरिकांसाठी आकुर्डीतून निगडीमार्गे आळंदीला जाणाऱ्या पीएमपी बसची आवश्यकता आहे. निगडी डेपो ते आळंदी बससेवा नाही. त्यामुळे आकुर्डी व परिसरातील नागरिकांना आळंदीला जाण्यासाठी शहराच्या अन्य भागात जावे लागते. तेथून आळंदी बसने प्रवास करावा लागतो. आकुर्डीतील विठ्ठल मंदिराजवळ संत तुकाराम महाराजांचे पालखी तळ आहे. त्यामुळे या भागात वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब विचारात घेऊन आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते निगडीमार्गे आळंदी ही बससेवा सुरू होण्याची गरज आहे. त्यावर महापालिका प्रशासनामार्फत कार्यवाही व्हावी, अशी मागणी संघाने केली आहे.”
आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देताना उपमहापौर शैलजा मोरे, अ प्रभाग समिती सभापती अनुराधा गोरखे, नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेवक सागर अंगोळकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.