निर्भीडसत्ता न्यूज –
मराठा क्रांती मोर्चाने आतापर्यंत शिस्तीचा, संयमाचा एक आदर्श घालून दिला. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे आणि दोन दिवसांपासून त्याचा वणवा राज्यभर पसरला आहे. या आंदोलनादरम्यान मराठवाड्यातील गंगापूर तालुक्यात कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाचा बळी गेला, ही अत्यंत दु:खद घटना आहे. मराठा समाजाने सनदशीर मार्गाने केलेल्या या शक्तिप्रदर्शनाची सरकारने योग्य दखल घेतली नाही. मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यात सरकार कमी पडले, त्यामुळेच आंदोलनाला आजचे आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. हिंसक आंदोलनांमुळे वातावरण तापले तरी त्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही.
भावनिक मुद्द्यावरील आंदोलन मोठ्या उंचीवर पोहोचल्यासारखे वाटले तरी ते दीर्घकाळ टिकत नाही. मराठा समाजाने मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष करायलाच हवा, परंतु त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा. आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. अॅट्रॉसिटीचा मुद्दा काढून मराठा-दलितांमध्ये, तसेच आरक्षणाच्या निमित्ताने मराठा-ओबीसींमध्ये तेढ वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे, नाही तर महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याचे पातक समाजाच्या माथी येईल.
आरक्षण गरजेचे वाटत असले तरी आपल्या दुखण्यांवर तेवढाच एक इलाज आहे, असे मानण्याचे कारण नाही. आंदोलनाला हिंसक वळण लागले तर तो कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बनतो आणि मग सरकारचे काम सोपे होते, हे लक्षात घ्यायला हवे. कोणत्याही आंदोलनाची एक निश्चित दिशा ठरवावी लागते.
मराठा समाजाने चुकांची पुनरावृत्ती टाळून जाणतेपणाने, नियोजनबद्ध रीतीने वाटचाल करावी. इतिहास जेत्यांचाच लिहिला जातो, हे आपणास ठाऊक आहे. आत्मघातकी मार्ग पत्करून ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. दलित, ओबीसी बांधवांनीही हा लढा आपला मानून त्याला ताकद दिली पाहिजे. गावगाड्यातील दलित, ओबीसी बांधवांना सोबत घेऊनच मराठा समाजाने व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईसाठी जोमाने सज्ज झाले पाहिजे.
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटी, निवृत्त न्या. बी. एन. देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, कष्टकरी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, अभ्यासक आणि वक्ते श्रीमंत कोकाटे, नाटककार जयंत पवार, अभिनेते सयाजी शिंदे, पत्रकार विजय चोरमारे, प्रकल्पग्रस्तांचे नेते संपत देसाई, नाटककार संतोष पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या मेघा पानसरे यांनी हे पत्र प्रसिद्ध केले आहे.