‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने कारगिल विजय दिवस व गुरुपौर्णिमा संयुक्तरीत्या साजरी
निर्भीडसत्ता न्यूज –
विद्यार्थीदशेत असतानाच मुला-मुलींमध्ये देशभक्तीचा संस्कार रुजविण्यासाठी पालक आणि शिक्षण संस्थानी पुढाकार घ्यायला हवा असे मत कारगिल युद्धातील महावीर चक्र विजेते नायक दिगेन्द्रकुमार यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने कारगिल विजय दिवस व गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
संस्थेच्या प्रा. सुनिता पाटील यांनी नुकतीच पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्यावतीने त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. मिलिंद मराठे, निवृत्त लष्करी अधिकारी प्रतापराव भोसले, यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय छत्रे यांच्यासह संस्थेचे सर्व अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नायक दिगेन्द्रकुमार यावेळी बोलताना त्यांनी कारगिल युद्धातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच श्रीलंकामध्ये एल.टी.टी संघटनेच्या दहशतवाद्याशी झालेल्या लढ्यातील प्रसंगांचीही त्यांनी आठवण सांगितली. कारगिल युद्धातील प्रसंगांचे वर्णन करताना यावेळी भारतीय लष्करातील जवानांनी दाखविलेले शौर्य हे नक्कीच वाखाणण्याजोगे होते असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय लष्करी जवानांच्या शौर्य कथा विद्यार्थींदशेतच युवकांना माहीत झाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्कीच सकारात्मक बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आपल्या मनोगतात प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते डॉ. शरद जोशी यांनी सांगितले की, आयुष्यात प्रत्येकाला आपले आई, वडील आणि शिक्षक हेच आपले खरे गुरु असतात हे विसरता कामा नये.
तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करताना ‘यशस्वी’ संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी सांगितले की, युवकांनी सिनेमातील नायकांचे खोटे शौर्य पाहुन भुरळून जाण्यापेक्षा भारतीय लष्करी जवानांचे खरे शौर्य सांगणाऱ्या शौर्यकथा माहीत करून घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.