निर्भीडसत्ता न्यूज –
रावेत येथील बंधा-यावरून जेवढे पाणी उचलले जाते. त्यातील 40 टक्के पाण्याची गळती होते. ही गळती रोखण्याऐवजी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जात आहे, म्हणजे “मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा” अशातला हा प्रकार आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
महापालिकेच्या शनिवारी (दि. 20) झालेल्या महासभेत विस्कळीत पाणी पुरवठ्यावर सहा तास वादळी चर्चा झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील पाणी टंचाईच्या समस्या मांडल्या. मात्र, प्रशासनाने त्याचा खुलासा केला नाही. तत्पुर्वीच सभा तहकूब केली. त्यामुळे दुस-या दिवशी विरोधी पक्षाला पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी लागली. यामध्ये सभागृहाचा अवमान झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. आयुक्तांनी 31 ऑक्टोबरपर्यंत अनधिकृत नळजोड नियमित न केल्यास संबंधित नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा फतवा काढला आहे. हे म्हणजे “आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी” हा प्रकार आहे. अनधिकृत नळजोडास प्रशासनच जबाबदार असून उलट नागरिकांना कारवाईची भिती घातली जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी म्हटले आहे.
रावेत बंध-यावरून जेवढे पाणी पालिका उचलते, त्यातील 40 टक्के पाण्याची गळती होते. गळती रोखण्यास प्रशासन काहीही प्रयत्न करीत नाहीत. उलट पाणी जपून वापरण्याचा सल्ला नागरिकांना दिला जातो. हे म्हणजे “मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा” यातला प्रकार आहे. मुळात पाईपलाईन जुन्या आहेत. त्यातच रावेत बंधा-यावरून आपण किती पाणी उचलतो. किती वितरीत करतो. याचे लेखापरिक्षण केले जात नाही. याकडे प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष आहे. या कृत्रीम पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांना वेठीस धरू नका. तसेच, अधिका-यांना देखील पाठिशी घालू नका. तातडीने पुरवठा सुरळीत करा, अन्यथा राष्ट्रवादीमार्फत तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दत्ता साने यांनी दिला आहे.