निर्भीडसत्ता न्यूज –
आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि राज ठाकरे एकत्र आले, तरी भाजपाला काहीच फरक पडणार नाही. केंद्रात आणि राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मावळ आणि शिरूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक चिंचवड येथील आहेर गार्डनमध्ये पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री दिलीप कांबळे, आमदार बाळा भेगडे, लक्ष्मण जगताप उपस्थित होते.
रावसाहेब दानवे म्हणाले की, पिंपरी चिंचवडमधील मदनलाल धिंग्रा मैदानात ३ नोव्हेंबर रोजी भाजपाच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आढावा बैठकीचे आयोजन आज केले होते. या सभेला एक लाखाहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन केले आहे. यावेळी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. दिवाळीनंतर राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहोत.
त्यानंतर राज्यभर सभा घेतल्या जातील. शिवसेनेसोबत युतीसंदर्भात अद्याप बैठक झालेली नाही. परंतू समविचारी पक्षांना सोबत घेऊनच भाजपा निवडणूकीला सामोरे जाईल. मतांचे विभाजन आम्ही होऊ देणार नाही.
शरद पवार आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. परंतू कोण कुणासोबत जातेय हे आम्हाला महत्वाचं नाही. ते एकत्र आल्यास भाजपाला काहीच फरक पजत नाही. भाजपा संघटनेच्या जिवावर निवडणुका लढवते, नशिबाच्या भरवशावर नाही असे सांगत केंद्रात आणि राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असा दावा रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.