निर्भीडसत्ता न्यूज –
केंद्रीय परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. आपल्या आरोग्याचे कारण देत त्यांनी ही घोषणा केली. निवडणूक न लढण्याचा माझा विचार आहे; पण त्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशमध्ये आलेल्या सुषमा स्वराज पत्रकार परिषदेत बोलत होत्या. आपल्या धारदार वक्तृवासाठी प्रसिद्ध असलेल्या सुषमा स्वराज या भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. मागच्या लोकसभेच्या वेळी त्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत होत्या. त्या देशातील पूर्णवेळ पहिल्या महिला विदेशमंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांच्याकडे काही काळासाठी ही जबाबदारी होती. त्या प्रभारी विदेश मंत्री होत्या.
स्वराज यांच्यावर 2016 मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी दीर्घकाळ उपचार घेतले. आपल्या मंत्रालयातील कामाच्या बाबतीत त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटरवरच्या जनतेच्या समस्यांची दखल घेऊन त्यांना मदत करण्यास त्या नेहमी पुढे असतात. यासाठी त्यांचे कौतुकही होत आहे.