निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात वारंवार सूचना देऊनही पाणीपुरवठा विभागाकडून कार्यवाही केली जात नसल्याबद्दल स्थायी समिती सदस्यांनी संताप व्यक्त केला. आयुक्त श्रावण हर्डीकर सभेला नसल्याने सदस्यांनी आवरते घेतले. पुढील सभेत आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा सदस्यांनी प्रशासनाला दिला आहे.
समितीची सभा मंगळवारी (दि.11) झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. दापोडी, पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी, आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वारंवार होणार्या या पाणीटंचाईत सुधारणा होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांकडे तक्रारी केल्यानंतर ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. तांत्रिक कारणे देऊन अधिकारी व कर्मचारी जबाबदारी झटकत आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या या ढिसाळ कार्यपद्धतीवर स्थायी समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सदस्य विलास मडिगेरी, सागर आंगोळकर, विकास डोळस, राजू मिसाळ आदींनी संताप व्यक्त करीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरले. पुढील सभेत अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असा इशारा सदस्यांनी दिला आहे.