निर्भीडसत्ता न्यूज –
आपल्या आरोग्यासोबत आपल्या पर्यावरणाचेसुद्धा रक्षण व्हावे तसेच नागरिकांना झाडे लावण्याची व जगवण्याची आवड निर्माण करण्यासाठी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या वतीने आषाढी एकादशीचे नैमित्य साधून शुक्रवार (दि१२) रोजी शहरात एक लाख तुळशीची रोपे वाटप करण्यात येणार आहेत. निसर्ग जपणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे व प्रत्येकाने आपल्या परीने निसर्गाची सेवा करायला हवी, याच भावनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे.झाडे लावून ती जगविण्याची आवड निर्माण होत नाही, तोपर्यंत नागरिकांना पर्यावरणाचे मूल्य समजणार नाही, असे मत उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी व्यक्त केले. पर्यावरण हे आपल्यासाठी एक वरदानच असून मानवांचे आरोग्य व स्वास्थ्य टिकविण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखलाच पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते! पंढरपूर हे या अनंदसोहळ्याचे केंद्रस्थान असले तरी सर्वदूर पसरलेल्या विठ्ठलभक्तांमुळे त्या आनंदाचे पडसाद स्थल-कालाच्या मर्यादा ओलांडून सर्वत्र पसरतात. आषाढी एकादशी, विठ्ठल आणि तुळस यांचा परस्परसंबंध सर्वस्तृत आहे . वारकऱ्यांसाठी तुळशीचे फार महत्व आहे. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळशीचे फार उपयोग आहेत. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असे सांगून तुकोबारायांनी पर्यावणाचे महत्व अधोरेखित केले आहेच. अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरणाचे महत्व पटवून दिले आहे.समाजसह वारकऱ्यांनी देखील पर्यावरणाविषयी जागरूक असायला हवे. तुळशीचे माहात्म्य वर्णन करणारा संत एकनाथांचा एक अभंग आहे.
धन्य तुळशीचा महिमा। नाही आणीक उपमा।।प्रातःकाली दर्शन। घडता पुण्य कोटी यज्ञ।।
नाम वदता हे तुळशी। ईछीले पुरवी मानसी।।
तुलसी नामाचा निजछंद। एका जनार्दनी आनंद।।
तर असे हे तुळशीचे व एकंदरच या निमित्ताने पर्यावरणाचे महत्व सर्वांना समजले पाहिजे, ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देण्यासाठी एक लाख नागरिकांना तुळशी रोपांचे वाटप शाळा,महाविद्यालय,विविध मंदिर परिसर,गणेश मंडळे आदी ठिकाणी शहरभर करण्यात येणार आहे. या निमित्ताने थोडया फार प्रमाणात का होईना सर्वांची ‘हरित’ आषाढी एकादशी साजरी व्हावी अशी अपेक्षा उपमहापौरांनी व्यक्त केली.