निर्भीडसत्ता न्यूज – राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना भोसरीत मताधिक्य मिळू शकले नाही. त्यांना २८ हजाराची पिछाडी होती. त्यामुळे केवळ भोसरी-भोसरी करू नका. भोसरी किंवा शिरूरपुरते मर्यादित ते नाहीत. त्यामुळे त्यांना तरी भोसरीत कसे यावेसे वाटेल, असे सुचक विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे.
खासदार झाल्यानंतर डॉ. कोल्हे भोसरी मतदारसंघात येत नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केल्या. यावर पिंपळे गुरव येथील बैठकीत बोलताना पवार यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. तसेच डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाचही पवार यांनी यावेळी केले.
पवार म्हणाले की, आमदार-खासदार होऊन दारोदारी फिरायचे असते, की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? कोल्हे दिल्लीत खासदार म्हणून चांगले काम करत आहेत. शेतकऱ्यांचे, बैलगाडय़ांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक पंतप्रधानांनीही केले आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना राज्यभर फिरावे लागणार आहे, असे पवारांनी सांगितले.