निर्भीडसत्ता न्यूज- भाजपात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर इतरही नेते भाजपात येतील असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपा प्रवेश झाला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
आम्हाला वाट दाखवणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. यापुढे आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करायचं आहे आणि त्याचमुळे माझ्यासहीत या सगळ्यांनीच भाजपात प्रवेश केला आहे असे मधुकर पिचड यांनी म्हटले आहे. आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चांगलं काम करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढील वाटचाल करायची आहे असंही पिचड यांनी म्हटलं आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांनाही टोला लगावला, शरद पवार असे म्हणत आहेत की ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्षांतर केलं जातं आहे मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्ही जेव्हा शिवसेनेतून गणेश नाईक, छगन भुजबळ यांना फोडले त्यांना अशीच धमकी दिली होती का? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. राईट पर्सन इन द राईट पार्टी हे आजचं भाजपातलं चित्र आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हटले?
महाराष्ट्रातल्या आपल्या कारकिर्दीने आपली वेगळी ओळख निर्माण केली असे दिग्गज लोक भाजपाच्या परिवारात आले याचा मनस्वी आनंद होतो आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ अनुभव असलेले मधुकर पिचड भाजपात आले हे महत्त्वाचे आहे. त्यांची एखादा विषय हाताळण्याची हातोटी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातल्या आदिवसी समाजात जे नेतृत्त्व मानलं जातं असे मधुकर पिचड आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत ते भाजपात येणे ही आनंदाची बाब आहे असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसंच कालिदास कोळंबकर हे लोकांमधून आलेले नेते आहेत. सामान्य माणसे आणि पोलिसांठी जे आंदोलन केले ती बाब चांगलीच आहे असंही त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला निश्चितपणे होईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. वैभव पिचड यांचही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे.