पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
अजित पवार हे शरद पवार साहेबांना वडील मानत होते. वडीलांना सोडून स्वत:चे साम्राज्य निर्माण करण्यासाठी तसेच, कारवाईपासून लपून राहण्यासाठी ते भाजपासोबत गेले. त्यांनी वडिलांचा विचार केला नाही. ज्या व्यक्तीने मुलगा पार्थचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी अजितदादा आले होते. दादांची आजची स्थिती काय आहे, हे त्यावरून समजते, अशी टीका करून पार्थच्या पराभवाचा बदला संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करून घेणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. आकुर्डी येथे झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना तसेच, पत्रकारांशी ते बोलत होते.
आमदार रोहित पवार म्हणाले की, वडीलासमान पवार साहेबांना सोडून अजितदादा भाजपात गेले. त्यांनी आपले पुरोगामी विचार सोडले आहेत. मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून छोटी जबाबदारी घेऊन राजकारणात उडी घेतली. दादांवर पवार साहेबांनी एबी फॉर्मची जबाबदारी दिली असल्याने त्यांनी मला जिल्हा परिषद निवडणुकीत एबी फॉर्म दिला. दादांनी सांगितलेली गोष्ट केवळ 50 टक्के खोटी आहे. ते भाजपासोबत गेल्याने खोटे बोलत असून, पुढे ते 100 टक्के खोटे बोलतील, असे लवकरच दिसेल, अशी टीका त्यांनी केली.
भाजपावर लोकांसह त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याने सुरक्षेसाठी रणगाडे पुरवा
पार्थ पवार याला वाय नव्हे तर झेड सुरक्षा देण्यात यायला हवी. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेत्यांना, त्यांच्या मुलांना, आमदारांना सुरक्षा देतात. मात्र, जेथे कोयता गँग आहे, गोळीबार होतो, महिला अत्याचार होतात, सामान्य लोक अडचणी येतात अशा ठिकाणी ते सुरक्षा देत नाहीत. भाजपा व महायुतीच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. तसेच, भाजपचे कार्यकर्तेही नाराज आहेत. दिलेली सुरक्षा पुरेशी नसल्याने मोठी सुरक्षा दिली जावी. इतकेच कशाला पुढे मागे दोन रणगाडे द्यावेत, अशी उपरोधिक टीका त्यांनी भाजप सरकारवर केली.
अजितदादांना माझे खुले आव्हान
अजितदादा आणि आ. सुनील शेळके यांच्यामध्ये दम असले तर, त्यांनी समोरासमोर येऊन बोलावे. त्यांच्यात चॅलेज घेण्याचा आत्मविश्वास असेल तर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बोलावे. ओपनमध्ये या दूध का दूध होऊन जाऊ द्या, असे खुले आव्हान आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. अजितदादा यांनी काही गोष्टी पुढे आणल्यास रोहित पवार व जितेंद्र आव्हाड यांना फिरणे मुश्किल होईल, असे आमदार सुनील शेळके यांनी आव्हान दिले होते. त्यावर ते उत्तर देताना बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची संस्कृती बिघडवली
गेल्या वर्षी झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत ज्या विरोधात लढलो, आता ते त्यांच्या बाजूने अजितदादा बोलत आहेत. आम्ही स्वाभिमान, विचार, निष्ठा बदलली नाही. शरद पवार साहेबांनी पिंपरी-चिंचवड शहरात एमआयडीसी तर, हिंजवडीत आयटी पार्क आणले. सर्वसामान्यांना तरूणांना नोकर्या उपलब्ध करून दिल्या. 2014 नंतर किती नव्या कंपन्या शहरात आणल्या. किती जणांना नोकर्या दिल्या, हे भाजपाने सांगावे. तळेगावात येणारी कंपनी त्यांनी गुजरातला पळविली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली आहे. निव्वळ गुजरातला मोठे करणे हे त्यांचे ध्येय आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
संजोग वाघेरे मावळचे नवे खासदार
आम्ही केलेल्या सर्वेक्षणात मावळ लोकसभा मतदार संघाच मशाल चिन्ह जोरात आहे. संजोग वाघेरे पाटील हे विजयी होणार असून, मावळचा नवा खासदार ते असणार आहेत, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.