निर्भीडसत्ता न्यूज –
आंबी येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल मंगळवारी सकाळी पडल्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेळके यांनी पाहणी केली. अधिवेशनासाठी नागपुरात असलेल्या आमदार सुनील शेळके यांच्याशी पुलासंदर्भात चर्चा झाल्यानंतर शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके यांनी तहसीलदार मधुसुदन बर्गे, तलाठी के.व्ही.मोरमारे, पोलिस निरीक्षक पवार, पाटबंधारे विभागाच्या वैशाली भुजबळ यांनी रस्ता बंद करण्याच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या.
तळेगाव स्टेशन, यशवंतनगरमार्गे एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरचा आंबी येथील सुमारे 50 वर्षे जुना पूल मंगळवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एमआयडीसीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस गेल्यानंतर पूल कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. हा पूल जुना व कमकुवत झाल्याने गेल्या पाच वर्षांपासून तो अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तळेगावकडून एमआयडीसीत जाण्यासाठी हा सर्वात जुना मार्ग असल्याने बंदीच्या आदेशाला न जुमानता अनेक ट्रकचालक व बसचालक सर्रास या पुलाचा वापर करीत असत. आज सकाळी पहिल्या पाळीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या दहा-बारा बस या पुलावरून गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर सव्वासहाच्या सुमारास मोठा आवाज होऊन पुलाचा मधला काही भाग कोसळला. रात्री पूल कोसळला असता व ती बाब कोणाच्या लक्षात आली नसती तर किंवा पहाटे कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस जाताना पूल कोसळला असता तर मोठा अपघात होण्याचा धोका होता, मात्र पुलावर कोणतेही वाहन नसताना पूल कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.
पूल कोसळल्यानंतर आंबी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भरत घोजगे, सदस्य बाबासाहेब घोजगे, पोलीस पाटील भानुदास दरेकर, अशोक घोजगे, जयराम मापारी, दत्तात्रय कानकुडे, माजी उपसरपंच नंदकुमार घोजगे, चंद्रकांत घोजगे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक थांबवली होती.
काही वर्षांपूर्वी आंबी ग्रामस्थांनी शासनाकडे निवेदन दिले होते. शासनाने पुलाच्या दोन्ही बाजूला बोर्ड लावले होते. जड वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेला होता. तरी जड वाहतुक चालू होती. याच रस्त्यावरील आंबी येथील ओढ्यावरील पूल देखील खचला होता. तो दुरुस्त केल्यानंतर पुन्हा अवजड वाहनांनी या रस्त्याचा वापर सुरू केला होता. आता मुख्य नदीवरील पूल कोसळल्याने कातवी पुलावरून मोठा वळसा मारून तळेगावला जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कोसळलेल्या पुलाच्या शेजारी नवा जास्त उंचीचा भक्कम पूल बांधून गैरसोय दूर करावी, अशी मागणी आंबी ग्रामस्थांनी केली आहे.