पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून शहरात पाणी आणण्याबाबत महापालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाच्या महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शुक्रवारी (दि. १२) पाहणी केली.
महापालिकेमार्फत चिखलीतील पाटीलनगर येथे ३०० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून शहरासाठी आणण्यात येणाऱ्या पाण्यावर या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सह शहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे आदी उपस्थित होते.
चिखली येथे २० एकर जागेमध्ये ३०० एमएलडी क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाची मुदत २४ महिन्याची आहे. महापौर माई ढोरे यांनी या प्रकल्प कामाच्या प्रगतीची दर महिन्याला माहिती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. यावेळी प्रकल्पाच्या १४०० मिलीमीट व्यासाच्या पाईपलाईनच्या कामाची देखील पाहणी करण्यात आली.
जलशुद्धीकरण केंद्र, पाईपलाईन आणि बंधाऱ्यातुन पाण्याचा उपसा या गोष्टी समांतर सुरु रहाण्याकरीता कामाचा वेग व नियोजन महत्वाचे आहे. मुदतीत काम पुर्ण झाल्यास शहराला सध्या सुरु असलेला दिवसाआड पाणीपुरवठा पुढील वर्षी नियमितपणे दररोज सुरू करता येईल, असे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.