निगडीत आ. लक्ष्मण जगताप, एकनाथ पवार यांचा नागरी सत्कार
निर्भीड न्यूज –
भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिन आणि गुढी पाडव्यानिमित्त ‘सप्तसूर संगीत’ हा कार्यक्रम घेण्यात आला. निगडी, यमुनानगर येथे शुक्रवार, दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात पंडित कल्याण, कार्तिकी, कौस्तूभ आणि कैवल्य या गायकवाड कुटुंबियांच्या सप्तसुरात उपस्थित रसिक आकंठ बुडाले. रसिकांमधील बालचमुने तर चक्क ‘कोरस’ देत ठेका धरला आणि कार्यक्रमाची रंगत अधिक खुलली.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नगरसेविका सीमा सावळे, आशा शेडगे, सारंग कामतेकर, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष उत्तम केंदळे, भाजपाचे यमुनानगर येथील अध्यक्ष बाबा परब, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या सारिका चव्हाण, संजय मंगोडेकर, अजय पाताडे यांच्यासह सुमारे तीन हजार रसिक या वेळी या वेळी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत आमदार जगताप आणि एकनाथ पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राज्य सरकारने त्याची दखल घेत अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत निर्णय घेतला. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडमधील हजारो बांधकामधारकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आ. जगताप आणि एकनाथ पवार यांचा या वेळी नागरी सत्कार करण्यात आला.
एकनाथ पवार या वेळी म्हणाले की, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता; मात्र भाजपाची सत्ता आल्यानंतर भाजपा सरकारने केवळ एका वर्षात हा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची अनधिकृत घरे नियमित झाली आहेत. भाजपा सरकारने हा निर्णय तत्काळ घेतला असून, न्यायालयाकडेही याबाबत पाठपुरावा करून, याबाबत न्यायालयीन निर्णयही लवकरच मिळेल.
सीमा सावळे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश अनधिकृत बांधकामे ही सर्वसामान्यांची आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासाठी आ. जगताप आणि एकनाथ पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
आमदार जगताप आणि नगरसेविका आशा शेडगे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. शाहीर प्रकाश ढवळे यांनी सूत्रसंचालन केले.
यानंतर सप्तसूर हा गायनाचा कार्यक्रम झाला. याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. सुनील थीगळे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत फ्यूजन प्रकारात, हे सुरांनो चंद्र व्हा, अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजन मोहना, रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला ही गाणी कार्तिकीने सादर केली. खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली या तिच्या गायनाला कोरस देत बालचमूने ठेका धरला.
देवाचिये व्दारी उभा क्षणभरी, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले हे गीतांबरोबरच कौस्तूभ याने शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.
विठू माउली तू माउली जगाची, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, यासह ‘शांताबाई’ हे गीत ठसकेबाज पध्दतीने स्वरबध्द करत बालगायक कैवल्य याने कार्यक्रमात रंगत भरली.
पंडित कल्याण गायकवाड यांनी ‘सुनो बाबा दुनिया मौज बुरी है’ हे संत कलामांचे उपदेशपर भजन सादर केले. तू सुखकर्ता तू दु:खहर्ता या गणेश वंदनाने सुरू झालेला हा कार्यक्रम एकापेक्षा एक सरस गाण्यांनी खुलत गेला आणि उपस्थित रसिक चांदण्यांच्या साक्षीने सप्तसुरात आकंठ बुडाले.